नगर – अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी पीक नुकसान भरपाईची जाहीर करण्यात आलेली मदत अत्यंत तोकडी असल्याने, शेतकऱ्यांची निराशा झाली असून, आता पीक विमा रकमेचा तरी भरीव लाभ मिळाला पाहिजे, अशी आशा पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
गेल्या महिनाभरात बरसलेल्या अवकाळी पावसाने राज्यभरात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामध्ये सोयाबीन, ज्वारी, कापूस, तूर, भात इत्यादी खरीप पिकांसह भाजीपाला व फळपिकांच्या नुकसानाचा समावेश आहे. हाताशी आलेल्या पिकांचे उत्पादन बुडाल्याने, शेतकरी हवालदिल झाला आहे.
त्यानुषंगाने अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यपालांकडून 16 नोव्हेंबर रोजी मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार दोन हेक्टरपर्यंत मर्यादेत खरीप पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी 8 हजार रुपये आणि फळपिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी 18 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
जिल्ह्यात 6 लाख 36 हजार 146 शेतकऱ्यांचे 4 लाख 54 हजार 12. 58 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. कृषी विभागाने नुकसान भरपाईच्या निकषानुसार तब्बल 475 कोटी 10 लाख 50 हजार रुपये नुकसान झाल्याचा अहवाल शासनाला पाठविला. त्यानंतर राज्यपालांनी मदत जाहीर केली.
पिकांच्या लागवडीसाठी केलेला खर्च आणि पिकांचे बुडालेले उत्पादन बघता, पीक नुकसान भरपाईची जाहीर करण्यात आलेली हेक्टरी मदत अत्यंत तोकडी असल्याने, शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यामधून नाराजी व्यक्त केली जात आहे.पीक नुकसान भरपाईच्या सरकारी मदतीने निराशा केली असल्याने, आता किमान पीक विमा रकमेचा तरी भरीव लाभ मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
पंचनामे ग्राह्य धरून पीकविम्याचा लाभ द्या!
अवकाळी पावसाच्या तडाख्यात राज्यात 4 लाख 54 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले;मात्र पीक नुकसान भरपाईची जाहीर करण्यात आलेली हेक्टरी मदत अत्यंत तोकडी आहे. त्यामुळे पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना विमा रकमेचा भरीव लाभ मिळाला पाहिजे. महसूल, कृषी विभागामार्फत करण्यात आलेल्या पीक नुकसानाचे पंचनामे ग्राह्य धरून, विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई दिली पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.