जुन्नर -जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागांमध्ये सोमवारी (दि. 11) सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
जुन्नर तालुक्यात दुपारपासूनच जोरदार वेगाने वारे वाहत होते आणि सायंकाळी या परिसरातील अनेक गावांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली. उंडेखडक गावाजवळील नांगरेवाडी येथे दोन बैलांवर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
शेतकरी कोंडू जनाजी नांगरे हे या जनावरांना चरायला नेत असताना ही घटना घडली. याचबरोबर अंजनावळे येथे विजेचे 4-5 खांब वाऱ्यामुळे कोसळले आहेत. येणेरे, बेलसर, पारुंडे या भागातही या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी आंब्याचे मोहोर गळून गेले आहेत, तर अनेकांची शेतातून काढलेला कांदा झाकण्यासाठी पळापळ सुरू होती.