जिल्ह्यातील स्थिती; केवळ 25 टक्केच पेरण्या, बळीराजा चिंतेत
पुणे – जिल्ह्यात हवेली, मुळशी, भोर व पुरंदर तालुक्यात आजअखेर सरासरीच्या तुलनेत 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. अन्य तालुक्यांतही वेळेवर पुरेसा पाऊस न झाल्याने आतापर्यंत केवळ 25 टक्के क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. पश्चिमेकडील पट्ट्यात भात रोपवाटिकेची कामे सुरू आहेत. आतापर्यंत भुईमूग आणि मूग या पिकांच्या अत्यंत कमी पेरण्या झाल्या आहेत.
जिल्ह्यात जून महिन्यात सरासरी 830 मिमी पाऊस अपेक्षित आहे. मात्र जून महिन्यात केवळ 188 मिमी पाऊस झाला आहे. सरासरीच्या तुलनेत 23 टक्के पाऊस जून महिन्यात झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 84 हजार 274 हेक्टरपैकी अवघे 45 हजार 668 हेक्टरवर म्हणजेच सरासरी 25 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.
यंदा हवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी आर्थिक परिस्थिती नसताना पिककर्ज घेऊन खरिपाची तयारी केली होती.
अनेकांनी खते, बियाणांची खरेदी केली होती; परंतु जून महिन्यात सरासरीहून अधिक कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे पेरण्या कमी प्रमाणात झाल्या आहेत. मात्र जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे आता पेरण्याना वेग येत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
बियाणे, खते उपलब्ध
मुख्य पिकामध्ये भात 11 टक्के, बाजरी 21 टक्के, मका 37 टक्के, मूग 34 टक्के, भुईमूग 9 टक्के आणि सोयाबीन 121 टक्के पेरणी झाल्याची आकडेवारी देण्यात आली. जिल्ह्यात 29 हजार 683 क्विंटल बियाणांची उपलब्धतता आहे. त्याचप्रमाणे 62 हजार 989 मेट्रिक टन खते उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाकडून देण्यात आली.