नुकसानभरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी, उपसभापती भगवान पोखरकर यांनी दिले तहसीलदारांना निवेदन
राजगुरूनगर – खेड तालुक्याच्या मध्य आणि पूर्व भागातही अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. काढणी योग्य पिकांना मोठा फटका बसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तरी शेतातील पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई मिळण्याची मागणी खेड पंचायत समितीचे उपसभापती भगवान पोखरकर यांनी केली आहे.
या मागणीचे निवेदन तहसीलदार सुचित्रा आमले यांना देण्यात आले. यावेळी उपसभापती भगवान पोखरकर, सर्जेराव पिंगळे, दीपक सातकर आदी मान्यवर उपस्थित होते. खेड तालुक्यात जूनपासून आतापर्यंत सलग अधूनमधून मोठा पाऊस पडत आहे. त्यामुळे खरीप हंगामातील भात, मका, सोयाबीन, ऊस बटाटा आदी नगदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणी योग्य आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. खेड तालुक्यात सर्वच भागात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने हाताशी आलेली पिकांची पावसामुळे नासाडी झाली आहे.
या पिकांचे तत्काळ पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रतिनिधी खेड तहसीलदार, तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई मिळण्याची मागणी करीत आहेत. मात्र, अद्यापपर्यंत पिकांचे पंचनामे सुरु झाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई मिळण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्या, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या निर्मला पानसरे, आखारवाडीच्या सरपंच शोभा मुळूक, खेड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍड अरुण मुळूक यांनी केली आहे. यावेळी मागणीचे निवेदन तहसीलदार आमले यांना देण्यात आले. यावेळी ऍड. सुखदेव पानसरे, ऍड. शंकर कोंबल, ऍड. शाम बवले, ऍड. माणिक पाटोळे, जयसिंग भोंगाडे, पांडुरंग जठार, अमोल टाकळकर आदी उपस्थित होते.
भात, मका, सोयाबीन, ऊस बटाटा आदी नगदी पिकांचे मोठे नुकसान
या परिसरात सर्वाधिक नुकसान –
खेड तालुक्यातील चास, आखारवाडी कामं, महाकाल, कान्हेवाडी, कडधे, बुरसेवाडी बीबी, वाडा, पापळवाडी, मिरजेवाडी बहिरवाडी कडूस यासह काळूस, सांडभोरवाडी, बहूळ, शेलपिंपळगाव, वाकी, शिरोली, वाफगाव, गुळाणी कनेरसरआदी परिसरात मोठे नुकसान झाले आहे.