पिरंगुट – अतिवृष्टीमुळे मुळशी तालुक्यात पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक भागातील भात पिके कापणी योग्य आली आहेत; परंतु परतीच्या पावसाने कहर केल्यामुळे भात पिके शेतामध्येच भिजत आहेत. तसेच काही शेतकऱ्यांनी भात पिके काढुन शेतामध्ये ठेवली आहेत. ती भात पिके भिजुन त्या पिकांचे नुकसान झाले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असल्याने सर्व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी मुळशी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंबंधी मुळशी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी सभापती राधिका कोंढरे, भोर विधानसभा अध्यक्ष सुनिल चांदेरे, कार्यअध्यक्ष अंकुश मोरे, महिला अध्यक्ष दिपाली कोकरे, युवक अध्यक्ष निलेश पाडाळे, उज्वला मारणे, चंदा केदारी, किसन नागरे, शशिकांत मोरे, अस्मिता मारणे, सुजाता शिंदे, साईदास शिंदे, योगेश मरळ व शेतकरी उपस्थित होते.
आधीच कर्जबाजारी असलेला शेतकरी या अतिवृष्टीमुळे आर्थिक अडचणीत सापडला आहे. या पावसामुळे शेतातील बाकीची कामे रखडली आहेत. पावसामुळे बळीराजाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. नुकसानीची भरपाई लवकरात लवकर
मिळावी असे या निवेदनात म्हणले आहे.
नुकसान भरपाई देण्याची राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी
अतिवृष्टीमुळे मुळशी तालुक्यातील शेतपिकाचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने या नुकसानीचे पंचनामे होणे गरजेचे आहे; परंतु निवडणुकीच्या काळात या पाऊस झाल्यामुळे तालुक्यातील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत. दोन दिवसात प्रशासनाने हे पंचनामे करुन घ्यावे.
– महादेव कोंढरे, माजी सभापती, मुळशी