नवी दिल्ली (प्रतिनिधी) – राजधानीमध्ये दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे दिल्लीकरांच्या अडचणीमध्ये वाढ झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. एकीकडे रस्त्यावर वाहनांच्या लांबचलाब रांगा लागल्या आहेत. तर दुसरीकडे अतिपावसामुळे मेट्रो लाईन देखील बराच वेळ ठप्प होती.
आयटीओपासून तर हजरत निजामुद्दीनपर्यंत रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर जनकपुरी, गुडगाव, राजोरी गार्डन, धोला कुंवासह अनेक भागात रस्त्यावर पाणी साचल्यामुळे दिल्लीकरांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला. यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर अनेक जण नाराजी व्यक्त करताना दिसत होते.
शिवाय अतिशय पॉश परिसर समजला जाणारा लोधी गार्डन भागात देखील पाणी साचले होते. महत्वाचे म्हणजे या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या भागात बहुतांश खासदारांचे वास्तव्य आहे, हे विशेष. या भागात देखील अनेक खासदारांच्या घरात पाणी साचले होते.
दिल्लीतील काही भागात गारा देखील पडल्या आहेत. यामुळे दिल्लीकरांचे सामान्य जीवन विस्कळीत झाले आहे.