पुणे – मंगळवारी रात्री झोडपल्यानंतर बुधवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली. मात्र, बुधवारी सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आणि काही क्षणांतच पावसाने रौद्र रूप धारण केले. या पावसाने शहरासह उपनगरांत मोठे नुकसान केले. यात अनेक घरांत पाणी शिरले असून रस्तेदेखील बंद करण्यात आले.
प्रचंड पावसामुळे आंबील ओढ्याला आलेल्या पुरात तब्बल 10 जण वाहून गेले असल्याची माहिती देण्यात आली आहे. यातील 5 जणांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले असून इतर जणांचा शोध सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. एनडीआरफची तीन पथकं यासाठी घटनास्थळी दाखल झाली आहेत. यामध्ये वाहून गेलेले पाच मृतदेह दत्तवाडी पोलिसांच्या हद्दीत सापडले आहेत. यामध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.
दरम्यान, मृतांचा आकडा वाढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहरातील सोसायट्या, घरे आणि वसाहतीमध्ये पाणी शिरल्यामुळे बचाव पथकांकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.