कोल्हापूर – जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील वेतवडे बेताची परिस्थिती आणि आजारपणाला कंटाळून एका वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे या दाम्पत्याने शेतातच चितेला लागणारे साहित्य एकत्र करुन ठेवले होते. आयुष्यभर एकमेकांना साथ देणाऱ्या या जोडप्याने अशा प्रकारे आपल्या जीवनाचा शेवट केलेला पाहून गावकरही हळहळ व्यक्त करत आहेत.
महादेव पाटील (वय 75) आणि द्वारकाबाई पाटील (वय 70) अशी आत्महत्या केलेल्या पती-पत्नीची नावं आहेत. या वृध्द दाम्पत्याने बुधवारी मध्यरात्री दोनच्या दरम्यान राहत्या घरी माळ्यावरील तुळईला नायलॉनच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. दोन मुले, सुना, नातवंडे असा त्यांचा परिवार आहे. वयाच्या सत्तरीनंतरही शेतात काबाडकष्ट करून जीवन जगावे लागत असल्याने आणि आजरपणही सुरू झाल्याने ती अस्वस्थ झाले होते. अखेर त्यांनी गळफास घेऊन जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. याबाबतची फिर्याद कळे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली
या वृद्ध दाम्पत्याने शेतातच अंत्यसंस्कार करण्यासाठी तयारी केली होती. अंत्यसंस्कारासाठी शेतातील एक कोपरा त्यांनी निवडला होता. मंगळवारी सायंकाळी त्यांनी अंत्यसंस्कार जागा तयार केली होती. अग्नी देण्यासाठी लाकडेही गोळा केली, पाण्याची घागर भरुन ठेवली, गवत आणि मयताचे साहित्य एकत्र केली होती. या हृदयद्रावक घटनेने गावातील सर्वचजण दु:खी झाले आहेत. याबाबतची फिर्याद कळे पोलीस ठाण्यात मुलगा आकाराम महादेव पाटील यांनी दाखल केली आहे.