सर्दी, ताप, खोकला, कफ यासह संधिवात, दम्याचे रुग्ण हैराण
आळंदी/पुणे -मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण, काही ठिकाणी पावसाची भूरभूर तर, रात्री थंडीचा कडाका अशा विचित्र आणि खराब हवामानामुळे जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य बिघडले आहे. सर्दी, ताप, खोकला, घसा, कफ आणि अशक्तपणा या त्रासांमुळे दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी वाढत आहे. विशेषत: दमा आणि संधिवात रुग्णांना अधिक त्रास होत असून, वयोवृद्ध आणि लहान मुलांना संधिवात, दमा आणि कफ झाल्यास तत्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे, असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले आहे.
ऋतुमान बदलामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ होते. मात्र, ऋतुमान बदलून दोन महिने झाले. डिसेंबर महिना संपत आला तरीही राज्यात थंडीचा कडाका म्हणावा तसा नाही. मात्र, गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे हवामानात लक्षणीय बदल झाला असून, तो आरोग्यासाठी घातक ठरत आहे. पुणे वेधशाळेकडून ऐन हिवाळ्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तविला आहे. सध्या पहाटे थंडी, धुके. तर सूर्याचे दर्शन झाले तरी ते काही वेळासाठी असून, दिवसभरातील ढगाळ वातावरणामुळे आरोग्यासंबंधी विविध तक्रारी वाढल्या आहेत.
“खबरदारी म्हणून वेळेत उपचार घ्यावेत’
या हवामानाचा त्वचेवरही परिणाम होत असून, वयोवृद्ध व्यक्ती, लहान मुले आणि शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तींना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना नाका-तोंडाला रुमाल बांधावे, लहान मुलांना पूर्ण कपडे आणि स्वेटर घालूनच बाहेर घेऊन जावे. साथीचे आजार पसरू नये यासाठी घर आणि परिसरात स्वच्छता ठेवावी. या दिवसात त्वचा कोरडी पडणे, खाज सुटणे या समस्या अधिक जाणवतात त्यामुळे तेल किंवा केमिकल विरहीत क्रीम लावावी. जेणेकरून त्वचा मऊ राहील, असे मत फॅमिली फिजिशियन डॉ. संजीव पाटील यांनी सांगितले.