सातारा (प्रतिनिधी) – करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्याचा आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज आहे. दोन स्वॅप केंद्र, दोन विलगीकरण कक्ष आणि एमडी मेडिसीन डॉक्टरांची “ऑन कॉल’ सुविधा यामुळे करोनाचे संक्रमण रोखण्याच्या शक्य तितक्या उपाययोजनांची अंमलबजावणी युद्धपातळीवर सुरू आहे. पुणे, मुंबइर्, नागपूर या मेट्रो शहरांतील विमानतळावरच सात देशांतून येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाइन कक्षात तपासणीसाठी दाखल करण्याच्या तयारीचा अहवाल विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी घेत जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात विशेष प्रशिक्षण शाळा घेण्याच्या तातडीच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार रविवारी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन होणार आहे.
परदेश प्रवास करून आलेल्यांवर लक्ष
परदेशातून येणाऱ्या सर्वच नागरिकांचे विमानतळावर स्क्रिनिंग करण्यात येत आहे. त्यानंतर ही माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली जाते. सातारा जिल्हयात 13 जण परदेश वारी करून आले आहेत. त्यांचे स्क्रिनिंग व तपासणी जिल्हा रुग्णालयांकडून यापूर्वीच करण्यात आली आहे. तरीही अशा व्यक्तींनी तब्बल चौदा दिवस घरातच राहवे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून घरातच विलगीकरण कक्ष निर्माण करून आलिप्त राहण्याचा सल्ला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिला आहे.
“सिव्हिल’ला दोन कक्ष
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी जिल्हा रुग्णालयात सहा बेडचे दोन विलगीकरण कक्ष युद्धपातळीवर तयार केले आहेत. आणखी आवश्यक साहित्य कोणते लागणार आहे, याची यादी जिल्हा प्रशासनाला दिली जाणार आहे. साताऱ्यात क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुणालय व कराडचे कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट येथे स्वतंत्र स्वॅप केंद्र सुरू करण्यात आली आहेत. गरजेप्रमाणे संबधित रुग्णांच्या घशातील स्वॅप वैद्यकीय अधिकारी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठवणार आहेत.
कर्मचाऱ्यांचे आज प्रशिक्षण
कोरोनाचा रुग्ण ओळखून कसा हाताळायचा, याचे जिल्हा रुग्णालय व काही प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित काण्यात आले आहे. कोरोनाच्या वेळी काय काळजी घ्यायची, बाधित क्षेत्रात एक किलोमीटर अंतरापर्यत सर्वेक्षण कसे करायचे, याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहे.
परदेशातून येणाऱ्या सर्व नागरीकांना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली ठेवले जाणार आहे. साताऱ्यात एका मंगल कार्यालयात ही सोय करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात एमडी मेडिसीन डॉक्टर नाही, ही ओरड सातत्याने होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांची “ऑन कॉल’ सुविधा सुरू ठेवण्यात आली आहे.
डॉ. आमोद गडीकर
जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा.
“मास्क’ कोणी व कसा वापरावा..!
करोना व्हायरस नावाचा एक आजार (कोविड- 19) डिसेंबर 2019 च्या सुरुवातीला चीन आणि आता 90 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरला आहे. भारतामध्येही या आजाराने प्रवेश केला असून मुख्यतः प्रभावित देशांमधून प्रवास केलेल्या व्यक्तींमध्ये असा आजार आढळलेला आहे. हा आजार पसरु नये अथवा संसर्ग टाळण्यासाठी लोकांमध्ये प्रभावी जनजागृती होणे गरजेचे असून यासाठी केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने पुढील उपाययोजना सुचविल्या आहेत.
वैद्यकीय मास्क वापरासंबधी…
बाजारात आज वेगवेगळ्या आकारांचे विविध वैद्यकीय मास्क उपलब्ध आहेत. विणलेल्या मऊ मुलामा असलेल्या कपड्यांचे मास्क आहेत, जे नाक आणि तोंड झाकून ठेवून संसर्गापासून दूर ठेवण्यास मदत होते. कोणत्याही आजाराची लक्षणे नसलेल्या निरोगी व्यक्तींनी मास्क वापरू नयेत. कारण यामुळे इतर लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. मास्कचा 6 तासांपेक्षा जास्त काळ किंवा त्याच मास्कचा वारंवार वापर केल्यास संसर्गाचा धोका उदभवू शकतो. आरोग्य यंत्रणा वगळून जेव्हा एखाद्या व्यक्तीला खोकला किंवा ताप जास्त येत असेल संसर्गाचा प्रसार प्रतिबंध होण्यासाठी तीन पदर असणारा मास्क वापर केल्याने इतर लोक आजार संक्रमणापासून दूर राहतात. यावेळी आपल्याला वारंवार आपले हात धुण्याची गरज आहे. ज्यावेळी आजारी व्यक्तीला भेट देणार असेल किंवा आपण आजारी व्यक्तीची काळजी घेत असताना सेवा देत असतो अशा वेळी सेवा देणाऱ्या व्यक्तींनीदेखील तीन पदर असणारा मास्क वापरण्याची गरज आहे. वैद्यकीय मास्कचा प्रभाव 8 तासापर्यंत प्रभावी राहतो. ते मधे ओले झाले तर ते त्वरित बदलणे आवश्यक आहे. ंवैद्यकीय मास्कचा वापर योग्यरित्या न झाल्यास आपण आजारापासून संक्रमित होऊ शकतो. वापरण्यात येणारा मास्क नाक, तोंड व हनुवटी घट्टपणे झाकणारा असावा. मास्कला स्पर्श करणे, गळ्यात टांगणे टाळा. वापरलेला मास्क पुन्हा वापरु नका. त्याची योग्य विल्हेवाट लावा. रूग्णांकडून वापरलेल्या मास्कबाबतीत काळजी घेताना सेवा देणारे कुटुंबीय तसेच जवळचे नातेवाईकांनी ब्लीच सोल्यूशन (5टक्के) किंवा सोडियम हायपोक्लोराइट सोल्यूशनमध्ये (1 टक्का) निर्जंतुकीकरण करुन असा मास्क एक तर जाळावा किंवा खोल जमिनीत दफन करून विल्हेवाट लावावी.
खोकला असेल तर…
खोकला किंवा शिंक येत असेल तर हातरुमाल अथवा कागदी टिश्युपेपर वापरावा. वापरलेल्या कागदी टिश्यूपेपरची तात्काळ विल्हेवाट लावावी. हात धुतल्यानंतर चेहरा, तोंड, नाक आणि डोळ्यांना स्पर्श करण्यापासून टाळा. खोकला किंवा शिंक येणाऱ्या व्यक्तींपासून कमीत कमी एक मीटर अंतर ठेवा. तुमच्या शरीराचे तापमान संतुलित ठेवा.
हात स्वच्छ धुवा…
साबण आणि पाण्याने किमान 40 सेकंद वारंवार हात धुवावेत. हात स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारा सॅनिटायझर हा 70 टक्के अल्कोहोलयुक्त असल्यास 20 सेकंदांसाठी वापरणे आवश्यक आहे. जर हात गलिच्छ किंवा मातीने भरलेले असतील तर अल्कोहोलययुक्त सॅनिटायझरने न हात धुता साबणाने हात स्वच्छ होईपर्यंत धुवावा.