उस्मानाबाद : जगभरात हाहा:कार माजवलेल्या करोना विषाणूचा आता भारतातील धार्मिक कार्यक्रमांवरही परिणाम होऊ लागला आहे. अजमेरनंतर दक्षिण भारतातील सर्वात मोठा दर्गा म्हणून उस्मानाबाद येथील हजरत ख्वाजा शमसोद्दीन गाजी दर्गा ओळखला जातो.
मात्र, करोनामुळे हजरत ख्वाजा शमसोद्दीन गाजी यांचा 715 वा वार्षिक उरुस रद्द करण्यात आला आहे.
या उरुसमध्ये धार्मिक कार्यक्रम होणार असून सांस्कृतिक कार्यक्रम आणि जत्रा होणार नाहीत, असा निर्णय जिल्हाधिकारी दीपा मुंडे मुधोळ यांनी घेतला.
करोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी जिल्हाधिकारी दीपा मुंडे मुधोळ यांनी बैठकीअंती हा निर्णय घेतला. जिल्हाधिकारी, वक्फ बोर्ड, उरुस कमिटी सदस्य आणि मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधी यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील प्रमुख उरुसपैकी एक असलेल्या या उरुसला 8 मार्चपासून सुरुवात होणार होती. मात्र, आता तो होणार नाही.
या उरुसचे आणि देवस्थानचे वैशिष्ट्य म्हणजे, या उरुससाठी हिंदू आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. हजरत ख्वाजा यांचे भक्त जगभरात असून उरुसमध्ये हिंदू धर्मासह मुस्लिम समाजाला विविध धार्मिक विधीचे मानपान आहे.