हैदराबाद (तेलंगणा) – तेलंगणातील भाजपचे आमदार टी राजा सिंह यांचे निलंबन मागे घेतल्याबद्दल एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपवर टीका केली आहे.
राजा सिंह यांनी इस्लामच्या संस्थांपकांविषयी आक्षेपार्ह उद्गार काढल्याने भाजपने त्यांना पक्षातून काढून टाकले होते पण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावरील ही कारवाई मागे घेण्यात आली आहे.
या संबंधात बोलताना ओवैसी यांनी म्हटले आहे की, द्वेषमूलक भाषणे हा भाजपच्या प्रचाराचा सर्वात सोपा मार्ग ठरला आहे. त्यामुळे त्यांचे नेते अशी वक्तव्य वारंवार करीत असतात.
टी राजा सिंह यांना भाजपने अभय दिले आता नूपुर शर्मांनाहीं पंतप्रधानांकडून आशीर्वाद मिळतील अशी टिप्पणीही त्यांनी केली. टी राजा सिंह यांना पक्षाने तेलंगणातील विधानसभा निवडणुकीत उमेदवारीही जाहीर केली आहे.