कोल्हापूर – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात ओबीसी आरक्षणाचा बट्ट्याबोळ झाला, असा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज केला आणि भाजपाचा समाचार घेतला.
“जातनिहाय जनगणनेची माहिती केंद्र सरकारने दिली नाही. त्यामुळेच ओबीसी आरक्षण मिळाले नाही. युती सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीसांना हे करता आले असते. पण त्यांनी एकमेकांकडे बोटे दाखवली. खरी माहिती समाजापुढे येण्यासाठी याची श्वेतपत्रिका काढावी. याची मागणी राज्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे’, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
“माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर पुन्हा ईडीने छापा टाकला. त्यावर बोलताना ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी तपास यंत्रणा आणि फडणवीसांवर हल्लाबोल केला. ‘एनआयएचा तपास पंचवार्षिक आहे का? पंचवार्षिक योजनेसारखा का तपास केला जातो? याचा छडा लवकरात लवकर लावावा. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत’, असा आरोप मुश्रीफ यांनी केला.
पुणे महानगरपालिकेने तयार केलेल्या वाझेंना आधी थांबवा –
माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक जिल्ह्यात वाझे आहे, असा आरोप करत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. त्यावर बोलताना मुश्रीफ म्हणाले, की ‘पुण्यातील आंबिल ओढा येथे बांधकाम व्यावसायिक व महापालिकेने सामान्यांची घरे पाडली.
बांधकाम व्यावसायिकांच्या हितासाठी पुणे महानगरपालिकेने गोरगरीब जनतेची घरे पाडली. पुणे महानगरपालिका ही भाजपाच्या ताब्यात आहे. पुणे महानगरपालिकेने तयार केलेल्या वाझेंना आधी थांबवा, मगच आमच्यावर बोला.’