मुंबई – शिवसेना आणि कॉंग्रेसला केंद्रातील आघाडीत समाविष्ट करण्याच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्या भूमिकेत चुकीचे काय आहे? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला.
राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी आज चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राऊत म्हणाले,शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी माझी आज चर्चा झाली. संघटनात्मक कामासंदर्भात ही चर्चा होती. भविष्यात पक्ष मजबूत असेल, तर सरकार अधिक काळ टिकेल, मुख्यमंत्री आमचाच राहील. त्यासाठी पक्षसंघटनेचे काम महत्त्वाचे आहे. सरकारबद्दलही चर्चा झाली. अधिवेशन असल्याने त्यांची तयारी सुरू आहे.
बाहेर चर्चा व्हावी, असे काही आजच्या बैठकीत नव्हते. सरकार आणि पक्षात सर्वकाही स्थिर स्थावर आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विकासाला आणि राजकारणाला गती देण्यास सक्षम आहेत. कुणी कितीही कंड्या पिकवल्या. कुणी कितीही ढोल बडवले, तरीही हे सरकार कार्यकाळ व्यवस्थित पूर्ण करेल, असा टोला त्यांनी भाजपाला लगावला.
सरनाईकांबाबत लवकरच बातमी
प्रताप सरनाईक यांच्या पत्राविषयी बोलताना राऊत म्हणाले, प्रताप सरनाईकांनी स्पष्ट सांगितलं आहे की, मी माझ्या भावना व्यक्त केल्या आहेत आणि मी आजन्म शिवसेनेतच राहीन आणि शिवसैनिक म्हणूनच मरेन.’ यासंदर्भात मीसुद्धा उद्धव ठाकरे यांच्याकडे बोललो आहे. प्रताप सरनाईक यांच्याविषयी तुम्हाला लवकरच बातमी कळेल, असे राऊत म्हणाले.