नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायदा आणि शेतकरी आंदोलनावरून देशात राजकारण तापले आहे. तर दुसरीकडे संसदेत या विषयावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरु आहे. दरम्यान, अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी केंद्र सरकारवर चांगल्याच संतापल्या आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान हिंसाचार होणार, याचा अंदाज का आला नाही, गुप्तचर विभाग कुठे होता, असा रोखठोक सवाल यावेळी हरसिमरत कौर बादल यांनी केला आहे.
केंद्र सरकारने चार तासात लॉकडाऊनचा निर्णय घेतला. एका दिवसात नोटबंदी जाहीर केली. असे असताना २६ जानेवारी रोजी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार होऊ शकतो, यासंदर्भातील सूचना गुप्तचर विभागाला मिळाली नाही का, प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारावेळी गुप्तचर विभाग कुठे होता, असा कडक सवाल हरसिमरत कौर बादल यांनी उपस्थित केला.
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शीख समुदायाचे मोठे योगदान होते. ७० टक्के शीखांचे हौतात्म्य देशाच्या कामी आले, असा दावा करत निशान साहिब ध्वजाला आरोपांच्या पिंजऱ्यात उभे केले. आपण सर्वांनाच खलिस्तानी ठरवून मोकळे होत आहात. आमच्या ९ व्या गुरुंनी तुमच्या लोकांच्या रक्षणासाठी स्वतः कामी आले, असे हरसिमरत कौर बादल म्हणाल्या. दीडशेहून अधिक आंदोलनकांनी आपला जीव गमावला. ते आमचे अन्नदाते आहेत. मात्र, त्यांच्याबाबत संवेदना दाखवत एकही शब्द बोलला गेला नाही. २६ जानेवारीला झालेला हिंसाचार होणे दुर्दैवाचे आहे. मात्र, यात गुप्तचर विभाग फेल गेला, त्याचे उत्तर कोण देणार, त्यासाठी जबाबदार कोणाला धरायचे, असे प्रश्न हरसिमरत कौर बादल यांनी यावेळी उपस्थित केले.
सहा महिन्यांपूर्वी अध्यादेश आणला गेला. तेव्हापासून शेतकरी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, सरकार मूक गिळून गप्प बसले आहे. शेतकऱ्यांना कायदा नको असेल, तर हा काळा कायदा मागे घ्यावा, अशी मागणी करत या कायद्यांतर्गत केलेल्या तरतुदीनुसार भारतीय खाद्य निगमला खरेदी आणि विक्री प्रक्रियेपासून दूर ठेवले जात आहे. म्हणूनच शेतकरी चिंतेत आहेत, असा दावा त्यांनी यावेळी बोलताना लोकसभेत केला.