Maratha Reservation: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात आज मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा झाली. या सभेला राज्यभरातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला, ते म्हणाले की, ”24 ऑक्टोबरपर्यंत आरक्षण मिळाले नाही, तर मी टोकाचे उपोषण करणार, मग एक तर माझी अंत्ययात्रा निघेल, नाही तर मराठ्यांची विजय यात्रा निघेल.” मनोज जरांगे पाटील यांच्या सभेनंतर आता अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत.
मराठा आरक्षणासाठी आमदारकीचा राजीनामा देणारे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आजची सभा झाली असून, सर्व एकत्र आले हे चांगले आहे. मात्र, ओबीसी आणि मराठा वाद लावण्याचा हा गेम आहे. भाजपकडून चकवा दिला जात असून, मराठ्यांचे काम होणार नाही.
तसेच आज जो कुणबी विषय आहे, ज्यामधून आरक्षण देण्याची मागणी होत आहे. हे शेवटी ओबीसीमध्येच घुसणार आहे. पण ओबीसी आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नसल्याचे राज्य सरकार सांगत आहे. त्यामुळे हा सर्व गेम असल्याचे माझं स्पष्ट म्हणने आहे. यामध्ये होणार काहीच नसून, फक्त मतांचे ध्रुवीकरण होणार आहे. ओबीसी समाज एका बाजूला आणि मराठा समाज एका बाजूला असणार. मराठ्यांचे तर काहीच काम होणार नाही, कारण जोपर्यंत संसेदत काही होत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही.
मनोज जरांगे पाटील यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे –
– 24 ऑक्टोबरपर्यंत आरक्षण मिळालं नाही, तर मी टोकाचं उपोषण करणार, मग एक तर माझी अंत्ययात्रा निघेल, नाही तर मराठ्यांची विजय यात्रा निघेल
– आरक्षण मिळाल्याशिवाय हा तुमचा मुलगा एक इंचीही मागे हटणार नाही
-22 ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेऊन पुढील आंदोलनाची दिशा सांगितली जाणार
– येत्या 10 दिवसांत मराठ्यांना आरक्षण द्या, नाहीतर पुढची जबाबदारी सरकारची
– मराठा भावांनो, आरक्षणाचा दिवस जवळ आलाय. 22 ऑक्टोबरला मराठा आंदोलनाची दिशा ठरणार आहे. 24 ऑक्टोबरपर्यंत सरकारची मुदत. 22 ऑक्टोबरला सगळ्या मराठा समाजाला सांगण्यात येणार आहे, पुढे काय करायचं.
– याच मराठ्यांनी तुम्हाला 106 आमदार निवडून दिले आहेत. हे तुम्ही विसरू नका. केंद्रात आणि राज्यात सत्ता आणायला मराठ्यांचा सिंहाचा वाटा आहे. मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका. पंतप्रधान साहेबांनी फडणवीस साहेबांना समज द्या. ते खालचे कार्यकर्ते अंगावर घालतायत. तुमच्यासाठी मराठ्यांनी काहीपण केलं आहे. उलट केंद्राला आणि राज्याला विनंती करतो, तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्या. हेच मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील.
-अजित पवार साहेब तुमच्या पक्षाच्या नेत्यांना समज द्या, नाहीतर मी असा मागे लागेन की मी सोडणारच नाहीय
– माझा माय-बाप मराठा शेतात काबाड कष्ट करतो. घाम गाळतो आणि घामातून आमच्या गोदा पट्ट्यातील 123 गावानं निधी जमा केला आहे. कापूस विकून शे-पाचशे जमा केले आणि इथे येणाऱ्या समाजाची सेवा करण्याचं काम केलं.
– 10 दिवसांपेक्षा जास्त वाट बघण्याची आता आमची तयारी नाही
– या गोरगरीब मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्रानं आणि राज्यानं तातडीने निर्णय घेऊन महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा आणि समावेश केल्याचा जाहीर निर्णय करावा
– तुमच्या हातात आणखी 10 दिवस आहेत, या 10 दिवसात मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, नाहीतर पुढचं 40 व्या दिवशी सांगू
मनोज जरांगे पाटील यांच्या पाच मागण्या –
1. महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र
2. कोपर्डी बलात्कारातील आरोपींना शिक्षा
3. मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या 45 बांधवांना निधी आणि सरकारी नोकरी
4. आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवांचं सर्वेक्षण करावं.
5. सार्थी संस्थेमार्फत PHD करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात यावे