नवी दिल्ली – करोनामुळे 29 मार्चपासून सुरू होणारी इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, करोनाचा वाढता धोका लक्षात घेता ही स्पर्धा आणखी पुढे जाऊ शकते किंवा रद्दही होऊ शकते. अशा स्थितीत जेव्हा ही स्पर्धा घेण्याचे निश्चित केले जाईल तेव्हा ही स्पर्धा प्रेक्षकांशिवाय रिकाम्या मैदानांवर खेळविण्यात यावी, असे मत भारताचा क्रिकेटपटू हरभजनसिंगयाने व्यक्त केले आहे.
करोनाचा धोका संपुष्टात आल्यावर देखील लगेच हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत स्पर्धा खेळविणे धोक्याचेच ठरेल, आशा वेळी मैदाने रिकामी ठेवून प्रेक्षकांना प्रवेश न देता ही स्पर्धा खेळविली जाऊ शकते. स्पर्धा रद्द झाल्याने केवळ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचेच (बीसीसीआय) नव्हे तर खेळाडूंचे, संघ मालकांचे तर नुकसान होणारच मात्र, या स्पर्धेमुळे ज्यांना रोजगार मिळतो त्यांचे तर प्रचंड हाल होतील.
सामना क्रिकेटचाच नाही तर कोणत्याही खेळाचा असो तो पाहण्यासाठी मैदानावर प्रेक्षक असलेच पाहिजेत मात्र, करोनाचा धोका लक्षात घेता लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने एकवेळ मैदान रिकामे ठेवून ही स्पर्धा खेळविली गेली तर त्याला माझा पाठिंबाच राहील, असेही हरभजनने व्यक्त केले.