प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 13 –“हर घर तिरंगा’ मोहिमेला प्रशासनाच्या कारभारामुळे ब्रेक लागला आहे. महापालिकेने तब्बल साडेनऊ लाख झेंडे क्षेत्रीय कार्यालयांना उपलब्ध करून दिले. मात्र, क्षेत्रीय कार्यालयांनी मात्र घरोघरी जाऊन झेंडे देण्याऐवजी “या आणि झेंडे न्या’ असा फतवा काढला. जनजागृतीही केली नाही. त्यातच शनिवार- रविवार सुट्टीमुळे कर्मचारी सुट्टीवर असल्याने ध्वज घरोघरी पोहचलेलाच नाही. परिणामी, अनेक नागरिक आणि सोसायट्या माजी नगरसेवकांकडे झेड्यांची मागणी करत असून त्यांचीही झेंडे पुरविताना दमछाक झाली आहे. तर, झेंडे मिळत नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.
महापालिकेने या मोहिमेसाठी 5 लाख झेंडे निविदेद्वारे मागविले होते. त्यातील निम्मे झेंडे खराब निघाल्याने ते ठेकेदारास परत केले. त्यानंतर बजाज कंपनीकडून महापालिकेस सुमारे 5 लाख झेंडे “सीएसआर’ मधून देण्यात आले. तर राज्यशासनाकडून अडीच लाख झेंडे महापालिकेस मिळाले. मात्र, यातही अनेक झेंडे खराब होते. त्यांचे वाटप क्षेत्रीय कार्यालय स्तरावर करण्याचे नियोजन प्रशासनाने केले.
त्यानुसार प्रत्यक्षात हे झेंडे घरोघरी जाऊन देणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात मुख्य खात्यांकडून क्षेत्रीय कार्यालयांकडे ही जबाबदारी देण्यात आल्यानंतर क्षेत्रीय कार्यालयांनीही नागरिकांनी कार्यालयात येऊन झेंडे घेऊन जावेत असे अघोषित फर्मान काढले. त्यानंतर झेंडे शिल्लक आहेत, असे दिसताच दोन दिवसांपूर्वी अचानकपणे घनकचरा व्यवस्थापन विभागाने हे झेंडे घरोघरी जाऊन देण्याचे आदेश दिले.
त्यासाठी आरोग्य कोठीवर हे झेंडे ठेवण्यात आले. मात्र, आधीच शहराच्या स्वच्छतेचे आठ तासांचे काम असलेल्या कर्मचाऱ्यांकडेच पुन्हा हे झेंडे वाटण्याची जबाबदारी देण्यात आली. मात्र, त्यांच्याकडूनही घरोघरी जाऊन झेंडे देणे शक्य न झाल्याने हे झेंडे आता क्षेत्रीय कार्यालयांकडेच पडून आहेत. शनिवारी, रविवारी सरकारी सुट्टी असल्याने केवळ स्वच्छता कर्मचारीच कामावर असून शनिवारी तर जवळपास सर्वच क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी सुट्टी असल्याने आपले मोबाइल बंद ठेवले होते. त्यामुळे आता मंगळवारीच क्षेत्रीय कार्यालयाचे दरवाजे उघडणार असून हे झेंडे पालिकेच्या उदासिनतेमुळे नागरिकांच्या घरावर फडकण्याऐवजी क्षेत्रीय कार्यालयांच्या गोदामात पडून राहण्याची स्थिती आहे.
हिशेबच कोठे आहे?
नेमके किती झेंडे मिळाले, क्षेत्रीय कार्यालयांना किती झेंडे दिले, क्षेत्रीय कार्यालयांनी किती झेंड्यांचे वाटप केले याची कोणतीही आकडेवारी महापालिकेच्या कोणत्याही विभागाकडे नाही. त्यामुळे प्रत्यक्षात केवळ मिळालेल्या आकडयांची माहिती महापालिका प्रशासन देत असून घरोघरी झेंड वाटल्याचा आकडाच प्रशासनाकडे नाही. तर प्रत्येक अधिकारी वेगवेगळे उत्तर देत असल्याने एका चांगल्या उपक्रमाचा सरकारी कारभाराने गोंधळ झाल्याचे चित्र शहरात आहे.
क्षेत्रीय अधिकारी म्हणतात, “20 टक्केच वाटले’
शहरातील क्षेत्रीय कार्यालयांकडून देण्यात आलेली माहिती काहीशी धक्कादायक आहे. महापालिकेच्या मुख्य खात्यांकडून देण्यात आलेल्या झेंड्यांमधील 80 टक्के झेंडे खराब असल्याने केवळ 20 टक्केच झेंडे वाटल्याचा दावा अधिकारी करत आहे. परिणामी, पालिकेने साडेनऊ लाख झेंडे मागविले असले तरी या दाव्यानुसार प्रत्यक्षात अडीच ते तीन लाख झेंडेच शहरात पोहोचले आहेत. तर मिळकतकर विभागाच्या माहितीनुसार शहरात 8 लाख निवासी मिळकती असून 4 लाख व्यावसायिक मिळकती आहे. त्यामुळे शहरात “हर घर नाही’ तर थोडेच घर तिरंगा अशी स्थिती आहे.