Vijay Hazare Birthday Special Story : भारतीय संघाचे माजी कर्णधार विजय हजारे यांच्या परिचयाची गरज नाही. त्यांनी भारतीय क्रिकेटला नवी ओळख दिली. हजारे यांनी महाराष्ट्रासाठी क्रिकेट खेळले आणि 1951 ते 1953 दरम्यान 14 सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्वही केले. ( Vijay Hazare ) हजारे हे स्वतंत्र भारताच्या क्रिकेट टीमचे पहिले कर्णधार होते.
1915 मध्ये आजच्या ( जन्म : 11 मार्च 1915, मृत्यू : 18 डिसेंबर 2004 ) दिवशी जगातील महान फलंदाजांपैकी एक विजय सॅम्युअल हजारे यांचा जन्म झाला. महाराष्ट्रातील सांगली येथे एका शिक्षकाच्या घरी जन्मलेल्या विजय हजारे यांच्या नावावर अनेक ऐतिहासिक विक्रमांची नोंद आहे, पण एक अशी कामगिरी आहे जी इतिहासात कधीही विसरता येणार नाही.
पहिल्या विजयासाठी पाहिली 20 वर्षे वाट…
ही कामगिरी, त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला क्रिकेट इतिहासातील पहिला विजय मिळवून देण्याची आहे. वास्तविक, भारतीय संघाने 25 जून 1932 रोजी क्रिकेट विश्वात प्रवेश केला होता. पण पहिला विजय नोंदवण्यासाठी संघाला 20 वर्षे वाट पाहावी लागली होती.
वास्तविक, भारतीय संघाने क्रिकेट इतिहासातील 25 वा सामना इंग्लंडविरुद्ध चेन्नई येथे खेळला. हा सामना 6 फेब्रुवारी 1952 पासून खेळला गेला. या सामन्यात विजय हजारे भारतीय संघाचे नेतृत्व करत होते. या सामन्यात विजय यांनी बॅटने चांगली कामगिरी केली नसली तरी त्याने आपल्या रणनीतीने इंग्रजांना चारी मुंड्या चीत (थक्क) केले होते.
इंग्लंडचा 1 डाव आणि 8 धावांनी केलं होतं पराभूत…
हा असा सामना होता की, ज्यात विजय हजारे यांनी आपल्या नेतृत्वाखाली इंग्लिश संघाचा अंहकार मोडीत काढला होता . वास्तविक, या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा एक डाव आणि 8 धावांनी पराभव केला. या सामन्यात डोनाल्ड केरच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 266 धावा केल्या होत्या.
यानंतर भारतीय संघाने पहिल्या डावात 9 गड्यांच्या मोबदल्यात 457 धावा केल्या आणि डाव घोषित केला. संघाकडून पॉली उमरीगरने सर्वाधिक नाबाद 130 आणि पंकज रॉयने 111 धावा केल्या. अशा प्रकारे भारतीय संघाने पहिल्या डावात 191 धावांची आघाडी घेतली होती.
या पहिल्या विजयाचे नायक होते विनू मांकड़…
पण दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ 183 धावांवरच गारद झाला होता आणि इंग्लंड संघानं एक डाव आणि 8 धावांनी सामना गमावला. या सामन्याचा खरा हिरो होता डावखुरा फिरकी गोलंदाज विनू मांकड़, ज्यानी पहिल्या डावात 55 धावांत 8 बळी घेतले होते. यानंतर त्यांनी दुसऱ्या डावातही शानदार कामगिरी सुरू ठेवत 53 धावांत 4 बळी घेतले. याव्यतिरिक्त गुलाम अहमद यांनी देखील दुसऱ्या डावातह 4 बळी घेत महत्वपूर्ण योगदान दिलं होते. अशा प्रकारे विजय हजारे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिला विजय नोंदवला होता.
विजय हजारेंनी झळकावले होते रणजीतील पहिले त्रिशतक…
आपल्या कारकिर्दीत विजय हजारे यांनी भारतासाठी 30 कसोटी सामन्यांमध्ये 47.65 च्या सरासरीने 2192 धावा जोडल्या आहेत. मात्र, विजय हजारे यांचे नाव आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा देशांतर्गत क्रिकेटमध्ये अधिक गाजले. अनेक विक्रम त्यांच्या नावावर आहेत. विजय हजारे यांनी त्यांच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत 58.38 च्या सरासरीने एकूण 18,740 धावा केल्या, ज्यात 10 द्विशतकांचाही समावेश आहे. तसेच रणजी ट्रॉफीच्या इतिहासात प्रथमच कोणी त्रिशतक झळकावले असेल तर ते विजय हजारे होते. महाराष्ट्राकडून खेळताना त्यांनी बडोद्याविरुद्ध 316 धावांची नाबाद खेळी खेळली होती. तसेच, देशांतर्गत क्रिकेटमध्ये 50 शतके झळकावणाऱ्यांमध्ये विजय हजारे हे पहिले नाव आहे.
भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील या खेळाडूच्या अप्रतिम योगदानामुळे 2002-03 मध्ये विजय हजारे ( Happy Birthday Vijay Hazare ) ट्रॉफी ( Vijay Hazare Trophy ) सुरू झाली. याला रणजी ट्रॉफीचे एकदिवसीय स्वरूप देखील म्हणतात. दरवर्षी रणजी संपताच ही ट्रॉफी सुरू होते. या स्पर्धेत 50 षटकांचे सामने असतात आणि रणजीमध्ये भाग घेणारे संघ या ट्रॉफीमध्ये भाग घेतात.