क्रिकेट हा भारतात एका धर्माप्रमाणे आहे. मात्र, हा धर्म केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठीच आहे का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. सध्या भारतात अ संघ तसेच दुलीप करंडक स्पर्धेचा मोसम सुरु आहे. मात्र, सामन्याशी संबंधित व्यक्तींव्यतिरीक्त सर्वसामान्य प्रेक्षकच नसल्याने खरी चिंता वाटत आहे.
करोनाचा धोका असताना व हा धोका संपल्यावर प्रेक्षक मैदानाकडे वळतील अशी अपेक्षा होती. ती साफ अपयशी ठरली. देशांतर्गत क्रिकेटला एकेकाळी तुफान गर्दी व्हायची, आता तर गर्दी सोडा दर्दीही मैदानांकडे सामना पाहण्यासाठी फिरकत नाहीत.
विजय हजारे, सय्यद मुश्ताक अली, विजय मर्चंट, दुलीप इतकेच नव्हे तर सर्वात मानाची समजली जात असलेली रणजी करंडक स्पर्धाही प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहे. त्यातच भारताचा अ संघ न्यूझीलंडच्या अ संघाशी मालिका खेळत आहे, त्यात भारतीय संघ यशही मिळवत आहे. तसेच या स्पर्धांमध्ये प्रख्यात क्रिकेटपटूही खेळत आहेत. तरीही सामना पाहण्यासाठी प्रेक्षक येतच नाहीत. याचे काय कारण असावे याचा आता बीसीसीआयने शोध घेत चित्र बदलण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. हे चित्र देशांतर्गत क्रिकेटमध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिकेत दिसत नाही. याचे मुख्य कारण त्यांच्याकडे याबाबत नियोजन केले जाते.
शालेय तसेच क्लब क्रिकेट खेळत असलेल्या मुलामुलींना मैदानात मोफत प्रवेश दिला जातो. केवळ देशांतर्गतच नव्हे, तर कसोटी सामन्यांनाही मुक्त प्रवेश दिला जातो. आपल्याकडे सचिन तेंडुलकरनेही ही संकल्पना सुचवली होती. त्याचे पुढे काय झाले ते कोणी सांगेल का. बिगबॅश, शेफील्ड, काउंटी या परदेशातील देशांतर्गत स्पर्धांना सिडनी, मेलबर्न, जोहान्सबर्ग किंवा वेलिंग्टन मैदानांवर तिकिट मिळवण्यासाठीही रस्सीखेच होते. मात्र, भारतात त्याच्या एकदम उलट चित्र दिसते.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्टार खेळाडूंनाही काही सामने खेळण्याचे बंधन केले तर परिस्थिती बदलेल का किंवा अन्य काही योजना तयार करणे शक्य आहे का हे बीसीसीआयने ठरवायलाच हवे. टाळ्या वाजवणारेच कोणी नसेल तर मैदानावरील कौतुकास्पद कामगिरीही मातीमोल ठरते.