पुणे – माणसाकडे साधन संपत्ती किती आहे, त्यापेक्षा त्याच्याकडे सुख, समाधान आणि शांती आहे का हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे संपत्तीच्या मोहात न पडता सुख, समाधान आणि शांती मिळवण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. आयुष्यामध्ये आपल्या डोळ्यांना जे दिसते ते खरे असलेच असे नाही, त्यामुळे सर्वांनी स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे यांनी केले.
महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाच्या वतीने गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने संस्थेच्या अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, जडावबाई दुग्गड विद्यालय, महर्षी वाल्मिक विद्यालय, आबनावे कला महाविद्यालय, दुग्गड माध्यमिक विद्यालय आदी शाखांमधील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला. या समारंभास संस्थेच्या चेअरमन सुमन घोलप, उपाध्यक्षा पी. डी.आबनावे, सहसचिव प्रकाश आबनावे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभा आबनावे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. ज्योती हिरे यांनी केले. आभार शीतल आबनावे यांनी मानले.