अमरावती : अपक्ष खासदार नवनीत राणा या मागील काही दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहत असल्याचे पाहायला मिळत आहे.दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात नवनीत राणा यांना हनुमान चालीसा प्रकरणामुळे तुरुंगात जावे लागले होते. त्याच प्रकरणाचा आधार घेत पुन्हा एकदा नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी मला महाविकास आघाडी सरकारच्या काळात जेलमध्ये टाकलं, त्यामुळे हनुमानजीने त्यांना दंड दिला. परिणामी ठाकरे सरकार कोसळलं, अशी टीका नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
दरम्यान, तत्कालीन मविआ सरकारमध्ये खासदार नवनीत राणा यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे म्हटले होते. त्यावरून राज्यात मोठा गोंधळ निर्माण झाला त्यात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली होती. त्याच अटकेवर आज पुन्हा एकदा नवनीत राणा यांनी बोलत उद्धव ठाकरेंवर टीका केली.