औंध, दि. 3 (प्रतिनिधी) -पाषाण, सुतारवाडी सोमेश्वर वाडी, बावधन बुद्रुक या भागातील नागरिक गेल्या दोन वर्षांपासून पाण्याच्या समस्येने त्रस्त आहेत, वारंवार तक्रार करून देखील प्रशासन ही बाब गांभीर्याने घेत नाहीत तसेच निधीअभावी काम होत नाही, अशी उत्तरे देण्यात येत आहेत याचा निषेध करण्यासाठी आज पुणे महानगरपालिकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप व माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी प्रभाग क्र.14 यांच्यावतीने हंडा मोर्चा काढण्यात आला.
माजी नगरसेवक प्रमोद निम्हण म्हणाले की, दुर्दैवाने महानगरपालिकेत या भागातील प्रतिनिधी नसल्याने गेल्या 5 वर्षांपासून या प्रभागाला दुय्यम वागणूक दिली जात आहे. वारंवार तक्रारी करून, निवेदन देऊन, पाठपुरावा करून देखील प्रशासन या भागात कुठलीही तरतूद किंवा बजेट देत नाही. ज्यामुळे मूलभूत गरजा सुद्धा या भागातील नागरिकांच्या पूर्ण होत नाही, म्हणूनच प्रशासनाला जागे करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे, आता तरी प्रशासनाने तातडीने पावलं उचलून या समस्यांचे निवारण करावे हीच अपेक्षा आहे
यावेळी पाषाण, बावधन, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी भागातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, अशी घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी माजी नगरसेविका सुषमा प्रमोद निम्हण, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, सविता दगडे, सुप्रिया प्रदीप हुमे, बालम सुतार, सूर्यकांत भुंडे, अभिजीत दगडे, दीपक दगडे, योगेश सुतार, हरिश्चंद्र शिंदे, समीर उत्तरकर, अमित खानेकर तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.