पिंपरी – “भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी… अर्ध्यावरती डाव मोडला… अधुरी एक कहाणी’ या जुन्या मराठी गीताप्रमाणे अनेकांचे संसार भातुकलीच्या खेळामधील डावाप्रमाणे अर्ध्यावरती मोडताना दिसत आहेत. चिंतेची बाब म्हणजे दरवर्षी घटस्फोटांच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. लॉकडाऊननंतर निर्माण झालेल्या वेगवेगळ्या अडचणींनी विवाहाच्या गाठी घटस्फोटापर्यंत आणल्या आहेत.
लॉकडाऊनच्या विविध कारणांनी पती-पत्नीमध्ये झालेले कलह घटस्फोटापर्यंत पोहचले असून या काळात न्यायालयात दीडपट जास्त प्रकरणे दाखल झाली आहेत. कुटुंब पद्धती टिकविण्यासाठी सामोपचाराने मार्ग काढण्याचा सल्ला वकिलांकडून दिला जात आहे.
दुसऱ्या लाटेत जनजीवन विस्कळीत झाले आहे. काहींना कंपन्यांनी घरातून काम करण्याची मुभा दिली तर काहींच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे घरातील कमावत्या पुरुषाचा वावर जास्त काळ वाढला. तसेच सतत एकमेकांच्या संपर्कात आल्याने पती-पत्नीमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत आहे. त्यातून घटस्फोटापर्यंत प्रकरणे गेली आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात कौटुंबिक न्यायालय नसल्याने शिवाजीनगर न्यायालयात ही प्रकरणे दाखल होत आहेत. त्यासंदर्भात शिवाजीनगर न्यायालयात 2020 मध्ये 1400 ते 1500 प्रकरणे दाखल झाली आहेत. तर ऑक्टोबरपर्यंत 2021 मध्ये 1914 प्रकरणे दाखल झाली आहेत. न्यायालयात या संदर्भात वर्षाला सुमारे 2200 ते 2300 प्रकरणे दाखल होत असल्याचे समजते.
या विषयी शिवाजीनगर न्यायालयातील ऍड. शैलेश शिंदे म्हणाले, लॉकडाऊनमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या. त्यात घटस्फोटांच्या प्रकरणांचाही समावेश आहेत. सध्या विभक्त कुटुंब पद्धती वाढत आहे. घरात पती-पत्नी आणि एखादे मूल असे त्रिकोणी किंवा चौकोनी कुटंब आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरात ज्येष्ठांचा समावेश उरला नाही.
कुटुंब व्यवस्था टिकविण्यासाठी घरात ज्येष्ठ व्यक्ती असणे महत्त्वाचे आहे. तसेच प्रत्येकाने समजुतीने वागणे तितकेच महत्त्वाचे आहे. तसेच एकत्र कुटुंब पद्धती असेल तर या गोष्टीला आळा बसण्यास मदत होईल. महिलांनी कमावती असणे किंवा नोकरदार असणे यात शंका नाही.
पण आपणही कुटुंबाचा एक भाग असल्याची जाणीव ठेऊन त्यांचे वर्तन असावे. दुसऱ्याला कमी लेखू नये. तर पुरुषांमध्येही आपण कमी शिकलेले, कमी पगाराची नोकरी असा न्यूनगंड असू नये. किंवा मला जास्त पगार, मीच कमावता, असा भेदभाव नको. त्यामुळे वाद होणार नाहीत आणि कुटुंब व्यवस्था टिकून राहण्यास मदत होईल. तरीही अशी परिस्थिती उद्भवल्यास एकत्र बसून मार्ग काढणे गरजेचे आहे.
समुपदेशन केंद्राकडे 349 अर्ज
प्रकरण घटस्फोटापर्यंत जाऊ नये, यासाठी समुपदेशन केले जाते. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील समुपदेशन केंद्रात गेल्या वर्षभरात 251 अर्ज आले होते, तर या वर्षाच्या 11 महिन्यांमध्ये 349 अर्ज प्राप्त झाले आहेत. समुपदेशनासाठी 2020 मध्ये आलेल्या 251 अर्जांपैकी 35 दाम्पत्य एकत्र नांदत आहेत. यावर्षी तर 1 जानेवारी 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत 349 अर्ज प्राप्त झाले असून त्यातील 76 दाम्पत्य घटस्फोटापासून वाचली आहेत. या वरून घटस्फोट घेणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे.