मुंबई – आयपीएल स्पर्धेतील बुधवारची लढत मुंबई इंडियन्ससाठी जिंकू किंवा मरू अशा स्वरूपाची आहे. या सामन्यात मात्र पंजाब किंग्जने मुंबईच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवताना 20 षटकांत 5 बाद 198 अशी मोठी मजल मारली. कर्णधार व सलामीवीर मयंक आग्रवाल व शिखर धवन यांनी दमदार अर्धशतकी खेळी केली. तसेच तळात जितेश शर्मा व शाहरुख खानने उपयुक्त खेळी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली.
मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. मात्र, त्याचा हा निर्णय साफ चुकल्याचे पहिल्या षटकापासूनच स्पष्ट झाले. आग्रवाल व धवनने मुंबईच्या प्रमुख गोलंदाजांवरच हल्ला चढवला. या जोडीने डावाच्या 10 व्या षटकातच संघाला 97 धावांची भक्कम सलामी दिली.
आग्रवाल या सामन्यापूर्वी साफ अपयशी ठरला होता, या सामन्यात मात्र, त्याने अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर मात्र तो लगेचच बाद झाला. त्याने 32 चेंडूत 6 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 52 धावांची खेळी केली. त्यानंतर मात्र, पंजाबच्या प्रमुख फलंदाजांनी निराशा केली. जॉनी बेअरस्टो व लियाम लिव्हिंगस्टोन यांना खेळपट्टीवर उभे राहता आले नाही. यावेळी धवन एकटाच वेगाने धावा करत होता. त्यानेही आपले अर्धशतक पूर्ण केले. धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात तोदेखील 70 धावांवर बाद झाला. त्याने या खेळीत 50 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार व 3 षटकार अशी फटकेबाजी केली. तळात जितेश शर्माने शाहरुख खानला साथीला घेतले व आक्रमक फलंदाजी केली.
शाहरुख खानने 6 चेंडूत 2 षटकार फटकावताना 15 धावांची उपयुक्त खेळी केली. जितेश शर्मा 15 चेंडूत 2 चौकार व 2 षटकार फटकावत 30 धावांवर नाबाद राहिला व संघाला 20 षटकांत 5 बाद 198 अशी भक्कम धावसंख्या उभारून दिली. मुंबईकडून बासिल थम्पीने 2 गडी बाद केले. जसप्रीत बुमराह, मुरुगन अश्विन व जयदेव उनाडकट यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक –
पंजाब किंग्ज – 20 षटकांत 5 बाद 198 धावा. (शिखर धवन 70, मयंक आग्रवाल 52, शाहरुख खान 15, जितेश शर्मा नाबाद 30, बासिल थम्पी 2-47, जसप्रीत बुमराह 1-28, मुरुगन अश्विन 1-34, जयदेव उनाडकट 1-44).