सोनिया गांधी यांचे आदेश ः दिल्लीतील नेत्यांची भंबेरी उडाली
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत माजी खासदारांना मैदानात उतरविण्याचा प्रयत्न फसला असला तरी कॉंग्रेसने दिल्लीमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे आदेश खासदारांना दिले आहेत.
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लोकसभेच्या उमेदवारांना विधानसभेची निवडणूक लढण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे कॉंग्रेस नेत्यांमध्ये पळापळ सुटली आहे. महत्वाचे म्हणजे, कॉंग्रेसचे नेते जेपी अग्रवाल आणि माजी खासदार महाबल मिश्रा यांनी निवडणूक लढविण्यास असमर्थता दर्शविली आहे.
तर अजय माकन यांनी विचार करण्यासाठी वेळ मागितली आहे. राजेश लिलोठिया आणि अरविंदर सिंग लवली यांनी विधानसभेची निवडणूक लढण्याची तयारी दर्शविली आहे.
महत्वाचा मुद्या असा की, सोनिया गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीतही माजी खासदारांना निवडणूक लढण्याचे आदेश दिले होते. मात्र, राज्यातील एकही नेता यास तयार झाला नव्हता. सोनिया गांधी यांनी हाच प्रयोग दिल्लीत करण्याचा प्रयत्न केला आहे.
जयप्रकाश अग्रवाल यांनी वयाच्या कारणामुळे लढण्यास नकार दिला आहे. शिवाय, आपला मुलगा निवडणूक लढत असल्याचे सांगितले. सोनिया गांधी यांच्यासोबतच्या बैठकीत सर्वाधिक चर्चेचा विषय राहिला तो कॉंग्रेसचे माजी खासदार महाबल मिश्रा यांचा मुलगा विनय मिश्रा यांनी आम आदमी पक्षात सामील होण्याचा.