फुरसुंगी – हडपसर-सासवड हा पालखी मार्ग राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गाच्या कामाचे भूमिपूजन झाले. मात्र, ज्या ठिकाणी चौपदरीकरणाची नितांत गरज होती तो भाग म्हणजे तुकाई दर्शन ते दिवेघाटदरम्यानचा रस्ता वगळून दिवेघाटापासून पुढे या पालखी मार्गाचे काम होणार असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम राहणार आहे, त्यामुळे या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात सदर भागाचा समावेश करावा, अशी मागणी होत असून जनआंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
याबाबत युवासेनेचे शादाब मुलाणी व राष्ट्रवादीचे सोमनाथ यादव म्हणाले की, तुकाई दर्शन ते दिवेघाटदरम्यानचा पालखी मार्ग खूपच अरूंद असून गेली कित्येक वर्ष दुरूस्तीचे काम झालेले नाही.
याबाबत नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंत्यांकडे कित्येक वेळा निवेदन दिलेली आहेत,मात्र, फारशी कोणी दखल घेतलेली नाही. लोकप्रतिनिधी या पालखीमार्गाविषयी निवडणुकीत फक्त भाषणबाजी करतात. परंतु, अद्याप तरी या मार्गाचे काम सुरू झालेले नाही.
सध्या, या मार्गाच्या साइड पट्ट्यांवर मुरूम टाकण्यात आला असून हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. पावसाळ्यात चिखल होऊन मोठ्या वळ्या पडल्या आहेत, त्यावरून वाहने घसरत आहेत. तसेच, खड्डे बुजविण्यासाठी मोठमोठे दगड वापरण्यात आल्याने वाहने खालील बाजूने घासत असल्याने नुकसान होत आहे. याशिवाय रेल्वे उड्डाणपूल अरूंद असल्याचे उरुळीदेवाची ते भेकराईनगरपर्रंत वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे.
विशेष म्हणजे, या महामार्गाची तसेच येथील समस्यांबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांबरोबर पाहणी दौरा करीत सूचना केल्या होत्या. परंतु, त्यानंतरही कुठलेही काम सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे संबंधित प्रशासनाने येथील समस्या लक्षात घेऊन या महामार्गाचे काम सुरू करताना तुकाईदर्शन ते दिवेघाटापर्यंतचा समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली असून परिसरातील नागरिकांच्यावतीने जनआंदोलनाचा इशारा शांताई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ यादव, रमेश निवंगुणे, अमोल कापरे, संतोष हरपळे, सचिन जगताप, नवनाथ हरपळे यांनी दिला आहे.