लखनौ – ज्ञानवापी मशिदीतील तीन दिवस चाललेले सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. तिसऱ्या दिवसाच्या सर्वेक्षणानंतर मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाने केला आहे. यानंतर हिंदू पक्ष वाराणसी न्यायालयात पोहोचले आणि न्यायालयाने विहिरीत ज्या ठिकाणी शिवलिंग सापडले ती जागा सील करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासोबतच त्या ठिकाणच्या सुरक्षेची जबाबदारीही आयुक्त, डीएम आणि एसपी यांच्यावर सोपवण्यात आली असून, तेथे कोणालाही जाऊ देण्याची परवानगी नाहीए.
ज्ञानवापी प्रकरणावर याचिकाकर्ते सोहनलाल आर्य यांनी दावा केला की, “बाबा सापडले आहेत. सर्वेक्षणादरम्यान शिवलिंगाचे दर्शन झाले आणि लोक हर हर महादेवाचा जयघोष करत आनंदाने नाचू लागले. पश्चिमेकडील भिंतीलगतच्या ढिगाऱ्याची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली असून ढिगाऱ्यातून मूर्तींचे अवशेष सापडतील असे त्यांनी म्हंटले आहे.
त्याचवेळी मुस्लीम पक्षाने त्याठिकाणी कोणतेही शिवलिंग सापडले नसल्याचे सांगितले आहे. तर हा अहवाल न्यायालयात सादर करून न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे प्रशासनाने सांगितले आहे.
दरम्यान, व्हिडिओग्राफी टीमने निवेदन देताना सांगितले की, “कोठेही कुलूप तोडण्यात आले नाही. सर्वांनी पूर्ण सहकार्य केले. संपूर्ण इमारत एकाच शैलीत बांधण्यात आली आहे. केवळ एकाच ठिकाणी कुलूप गंजलेले असल्याने परस्पर संमतीने ते तोडण्यात आले.
सर्वेक्षण संपल्यानंतर वाराणसीचे आयुक्त सतीश गणेश यांनी सर्व पक्षांचे आभार मानले. आयुक्त म्हणाले, “आम्ही सर्व भागधारकांशी बोललो आणि न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे महत्त्वाचे आहे यावर एकमत झाले. लोकांचे गैरसमजही आम्ही दूर केले आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम केले. तीन दिवस चाललेले सर्वेक्षण संपले आहे. आम्ही काशीच्या लोकांच्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानतो.”
माध्यमांशी बोलताना वाराणसीचे डीएम कौशल राज शर्मा म्हणाले, “चौकशी आयोगाच्या एकाही सदस्याने ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचा तपशील उघड केला नाही. कुठेही घोषणाबाजी करण्यात आली नाही. सर्वेक्षणाबाबत कोणी काही सांगितले असेल तर ते त्यांचे वैयक्तिक विचार आहेत. न्यायालय हे सर्वेक्षणाच्या माहितीचे संरक्षक आहे.