पुणे – वैचारिक मतभेदांमुळे दोन वर्षांपासून वेगळे राहणाऱ्या दाम्पत्याचा घटस्फोट अवघ्या 9 दिवसांत कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांनी घटस्फोट मंजूर केला आहे. दोघांनी ऍड. आकाश सुधीर चव्हाण आणि ऍड. खय्युम नय्युम सय्यद यांच्या मार्फत कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोट मिळण्यासाठी अर्ज केला होता.
गौतम आणि गौतमी ( नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. मे 2019 मध्ये दोघांचा प्रेम विवाह झाला होता. दोघेही शिक्षित आहेत. त्यांना मूलबाळ नाही. जानेवारी 2020 पासून वेगळे राहत होते. ते दोघे एकत्र येण्याची शक्यता नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निवाड्यानुसार सहा महिन्याचा कालावधी वगळण्याची मागणी अर्जदारांच्या वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिला. दोघेही आर्थिक दृष्टीने स्वावलंबी असल्यामुळे त्यांच्यात काहीही आर्थिक देवाण – घेवाण नाही.
प्रेम विवाह योग्य आहे की नाही हे सांगणे कठीण आहे. कारण काहींचे स्वभावच असे असतात की जुळवून घेता येत नाहीत. नात्यात समजूतदारपणा हवा. या प्रकरणात परिस्थिती पाहता दोघांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतला आहे. परस्पर संमतीने घटस्फोट घेतल्याने वेळ, पैश्याची बचत आणि होणाऱ्या मानसिक त्रासातून सुटका झाली आहे.
ऍड. आकाश सुधीर चव्हाण, ऍड. खय्युम नय्युम सय्यद, अर्जदारांचे वकील