हे शस्त्रेंविण साधिती । दोरेंविण बांधिती । ज्ञानियासी तरी वधिती । पैज घेउनि ।।
श्री ज्ञानेश्वरीतील तिसऱ्या अध्यायातील ओवी क्र. 257, 258, 259 यामध्ये माऊली म्हणतात की, काम आणि क्रोध मनुष्य प्राण्याला पाण्यावाचून बुडवतात, अग्नीवाचून जाळतात आणि त्याला न कळत पूर्णपणे ग्रासून टाकतात.
काम आणि क्रोध कोणत्याही शस्त्राचा आधार न घेता संधी साधून मारतात. ते दोरखंडाशिवाय तुम्हाला बांधू शकतात. ज्ञानी पुरुषाला देखील प्रतिज्ञा करून ते नष्ट करतात म्हणजे त्यांच्यात देहबुद्धी उत्पन्न करतात. चिखलाचा आधार न घेता ते घट्ट रोऊन बसतात.
पाशा वाचून बंधनात अडकवितात. असे हे काम-क्रोध सर्वांच्या देहात गुढरूपाने राहत असल्यामुळे कोणाच्या अधीन होत नाहीत. मनुष्यप्राण्याच्या सर्वात मोठ्या शत्रूंचा परिचय माऊली असा सहज करून देतात.
रजोगुणापासून उप्पन्न होणारा काम आहे आणि तो क्रोधाचे रूप धारण करतो. म्हणून अशा सर्व भक्षक, महापापी शत्रूपासून सदैव सावध राहा.