ज्ञानोबांच्या पालखीचे पावसाने स्वागत केले
सासवड, ता. 1 – संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुरंदरमध्ये येताच पावसाने पालखीचे स्वागत केले. पालखीबरोबर भाविकांची गर्दी बेताची दिसत होती. समवेत औषधे, पिण्याचे पाणी, पोलीस इ. व्यवस्था उत्तम होती. सासवडहून संत सोपान महाराज, चांगा वाटेश्वर यांच्या पालख्या पंढरपुरास जाण्यास रवाना झाल्या.
आता सर्वांना बैल तगाई!
पुणे – ज्यांचे बैल मेले आहेत किंवा शेतीचे काम करण्यास असमर्थ झाले आहेत व या कारणांमुळे ज्यांची जमीन बैलांविना नांगरट न होता तशीच पडून राहणार आहे, अशा टंचाईग्रस्त भागांतील सर्व शेतकऱ्यांना प्रत्येकी एक हजार रुपये मर्यादेपर्यंत बैल तगाई देण्याचा आदेश महाराष्ट्र शासनाने दिला आहे. 10 एकरपर्यंत जमीन असणाऱ्यांनाच तगाई मिळेल, ही अट काढून टाकण्यात आली आहे.
नक्सलवादी चळवळ पुन्हा उफाळणार? बंगाल सरकारचा इशारा
कलकत्ता – नक्सलवादी चळवळीचे पुनरुज्जीवन होण्याचा धोका आहे तरी सावधान असा इशारा पश्चिम बंगालमधील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सरकारने दिला आहे.
कुरुक्षेत्र तीर्थाचे पुनरुज्जीवन
कुरुक्षेत्र – महाभारतात प्रसिद्ध असलेले कुरुक्षेत्र तीर्थ गुलझारीलाल यांचे हस्ते खुले झाले. या तीर्थाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी 1 कोटी रुपये खर्च आला.
दर 30 मिनिटांत एक नवी खोली तयार!
नवी दिल्ली – तामीळनाडू सरकारने झोपडपट्टी निर्मूलन कार्यक्रमानुसार मद्रास शहरात दर 30 मिनिटाला एक नवी खोली बांधून येथे झोपडपट्टीतील लोकांचे पुनर्वसन करण्याचे ठरविले आहे.