मुंबई : कांदिवलीच्या हिरानंदानी हेरिटेज सोसायटीतील बोगस लसीकरण प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. लसीकरण झालेल्या दहा शिबिरांत सलाइनचे पाणीच दिल्याचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी स्पष्ट केले. मात्र अद्याप ७८४ लसींचा हिशेब पोलिसांना लागत नसून त्यानुसार चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
बोगस लसीकरण प्रकरणात अद्याप मुंबईत नऊ आणि ठाण्यात एक असे १० गुन्हे नोंद झाले आहेत. दरम्यान, पालिकेने शिवम रुग्णालयाला पुरवलेल्या एकूण कोविडच्या एकूण मात्रांतून १७,१०० लोकांचे लसीकरण होणे आवश्यक होते. मात्र चौकशीत अजून ७८४ लोकांना लस दिली गेल्याचे दिसत असल्याने या लसी नेमक्या कुठून आल्या, याबाबत चौकशी सुरू आहे.
विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले की, गेल्या चार दिवसांत अजून तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, यात मुख्य सूत्रधार डॉ. मनीष त्रिपाठी, शिबिराचे काम सांभाळणारा कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाचा कर्मचारी राजेश पांडे यांच्यासह शिवम रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
या प्रकरणी एकूण १३ जणांना अटक करण्यात आली असून, १० शिबिरांमध्ये दोन हजार ६८६ जणांना लस दिली गेली आहे. यात लस देणाऱ्या नर्सिंगच्या मुलांना साक्षीदार बनवण्यात आले असून, लसीची ने-आण करणाऱ्या विद्यार्थ्यांना अटक केली आहे.
अटक आरोपींपैकी महेंद्रसिंग हा गुडीया यादवला प्रमाणपत्र तयार करण्यासाठी नाव आणि माहिती पुरवायचा हे उघड झाले. तर एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका हिरे कंपनीच्या १०४० लोकांना बनावट लस दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेथेही लोकांना अशा प्रकारे लस देण्यात आली होती. अंबोली पोलिसांनीही या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे; तर डॉ. त्रिपाठीच्या सहीचे नऊ प्रमाणपत्र नऊ प्रमाणपत्र पोलिसांनी हस्तगत केली आहेत.