– महंत विष्णू म. केंद्रे
का लवणाची कुंजरी । सूदलिया लवणसागरीं । होयचि ना माघारी । परती जैसी।। श्री ज्ञानेश्वरीच्या पंधराव्या अध्यायात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मिठाची हत्तीन करून तिला समुद्राचा ठाव पाहण्यास पाठविले असता ती जशी परत येत नाही, त्याचप्रमाणे परमात्म्याला नामसाधनाने पाहायला गेले असता तत्त्वत: जीव परमात्मारूपच होतो. या सर्वसमर्थ परमात्म्याचे नाम त्याच्यापेक्षाही समर्थ आहे.
याबद्दल अनेक उदाहरणे देता येतील. जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, तुझ्या नामाचा महिमा । तुज न कळे मेघशामा ।। हे मेघशामा तुझ्या नामाचा महिमा तुम्हालाच कळत नाही. एवढे थोर नाम आहे. त्याचे चिंतन थोर आहे व नामधारक जो असेल त्याचा जन्म धन्य होतो.
त्यामुळे आपल्या नाशिवंत देहाची सार्थकता करून मरणोत्तर उत्तमगती मिळविण्यासाठी तुम्ही हरि या नामाचा अखंड जप करा. असे केल्याने तुमच्या त्या पुण्याची सर दुसऱ्या कोणत्याही पुण्यास येणार नाही.