जयातें नीतिपंथें चालिजे । सत्यधूत बोलिजे । देखावें तें देखिजे । शास्त्रदृष्टीं ।।445।। वेद तो जागेश्वरु । जया व्यवसाय निजाचारु । सारासार विचारु । मंत्री जया ।।446।। श्री ज्ञानेश्वरी अध्याय सातवा माऊली येथे जीवनभर, मृत्यूपर्यंत साधना करूनही मोक्ष प्राप्ती न झालेल्या मुमुक्षुविषयी विचार मंथन करतात.
मृत्यूनंतर स्वर्गलोकातील विश्रांती संपल्यानंतर पुनः तो साधक या योगभ्रष्ट मनुष्य लोकात जन्माला येतो. परंतु तो अशा कुळात जन्माला येतो जे धर्माचे साक्षात माहेर आहे आणि सकल ऐश्वर्यरूपी लक्ष्मीच्या शेतात, भाताचे पीक कापून टाकल्यानंतर बुडख्यापासून पुन्हा उगवलेल्या रोपाप्रमाणे उगवत असतो.
येथे मतितार्थ असा की मुमुक्षुचे पुर्वजन्माचे आयुष्य संपले तरी सुद्धा साधनेमुळे जणू त्याला पूर्वदेहातूनच भाताच्या रोपाप्रमाणे नवीन देह प्राप्त होतो. तो अशा कुळात जन्म घेतो की, जेथे नीतिमार्गानुसार आचरण घडते,
सत्यपूर्ण शुद्ध भाषण होते आणि जे जे पाहावयाचे ते ते शास्त्र दृष्टीनेच पाहिले जाते. ज्या कुळात वेद हे जागते दैवत आहे, विहित धर्माचरण हा ज्यांचा व्यवसाय आणि सारासार विवेकपूर्ण विचाराला प्राधान्य आहे अशा अतिदुर्लभ कुळात हा मुमुक्षु जन्म घेतो.