जे ज्ञानाचा कुरुठा । तेथ सेवा हा दारवंठा । तो स्वाधीन करी सुभटा । वोळगोनी ।। 166 ।। श्री ज्ञानेश्वरीतील चौथ्या अध्यायात माऊली साधकाला परमार्थ सुख आणि ज्ञान प्राप्त करण्याकरता संतांचे सान्निध्य किती महत्त्वाचे आहे, याविषयी मार्गदर्शन करतात.
अत्यंत उत्तम असे आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावयाचे अशी मनापासून इच्छा असेल आणि मनःचक्षूला त्याचा अनुभव घेता यावा असे वाटत असेल तर शब्दज्ञानी व साक्षात्कारी संतांची सर्वभावे सेवा करावी. कारण संत म्हणजे साक्षात ज्ञानाचे कोठार आहे. त्यांची सेवा म्हणजे त्या ज्ञानाच्या कोठाराचा उंबरठा आहे.
त्या सेवारूपी उंबरठ्याचा अवलंब करून तो आपल्या स्वाधीन करून घ्यावा. हा सेवारूपी उंबरठा स्वाधीन करून घेण्याकरिता शरीराने, मनाने व जीवाभावाने त्यांच्या चरणाशी शरण जावे आणि अभिमान सोडून नम्रपणे त्यांची सर्व सेवा करावी.
तुम्हाला इच्छित ज्ञान हे गुरू किंवा संत यांच्याकडून प्राप्त करण्यासाठी आपला पूर्ण समर्पण भाव हवा. काया, वाचा आणि मन त्यांच्या चरणी लीन होऊन सर्व अहंकाराचा त्याग करून त्यांचे दास्यत्व स्वीकारावे, असा उपदेश ज्ञानेश्वर माऊली करतात.