सातारा -प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी सुगम आणि दुर्गम शाळांची यादी जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी जाहीर केल्यापासून “गुरुजीं’ची चिंता वाढली आहे. सातपैकी चार निकष पूर्ण करणाऱ्या शाळा दुर्गम घोषित करण्यात येणार असल्याने शिक्षकांची डोकेदुखी वाढली आहे. शिक्षक बदल्यांवरुन शिक्षक संघटनांसह शिक्षकांनी शासकीय कार्यालयाचे उंबरे झिजवण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाने घोषित केलेल्या यादीवर जिल्ह्यातून 392 आक्षेप आले असून चार निकषांच्या मुद्यांवर शिक्षक संघटनांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत विनय गौडा काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
जिल्ह्यात 2 हजार 732 प्राथमिक शाळा असून त्यापैकी 229 शाळा अवघड क्षेत्रात (दुर्गम) येत आहेत. सात निकषांपैकी चार किंवा चारपेक्षा जास्त निकष पूर्ण करणाऱ्या शाळांची यादी विनय गौडा यांनी प्रसिध्द केली आहे. पाटण तालुक्यात सर्वाधित 122 तर महाबळेश्वर तालुक्यात 71 अवघड क्षेत्रातील शाळा आहेत. कोरेगाव, खटाव, फलटण, माण या चार तालुक्यांतील एकही शाळा अवघड क्षेत्रात आली नसली तरी काही ठिकाणी आक्षेप दाखल झाल्याने ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. अवघड क्षेत्रातील सात निकषांपैकी चार किंवा चार निकष पूर्ण करणाऱ्या शाळा अवघड क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.
नक्षलग्रस्त गाव क्षेत्रात असणारे गाव, वार्षिक पर्जन्यमान दोन हजार मिलीमीटरपेक्षा जास्त किंवा नैसर्गिक आपत्तीने सातत्याने संपर्क तुटणारे गाव, हिंस्र वन्यप्राण्यांचा उपद्रव असणारा जंगलव्याप्त प्रदेश, वाहतुकीच्या सुविधांचा अभाव असणारे गाव, वाहतूक योग्य रस्त्यांचा अभाव, रस्त्याने न जोडलेल्या शाळा, संवाद छायेचा प्रदेश, डोंगरी भाग प्रदेश, राष्ट्रीय- राज्य महामार्गापासून 10 किलोमीटरपेक्षा जास्त दूर अशा सात निकषांपैकी चार निकष पूर्ण करणाऱ्या शाळा अवघड क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. वास्तविक काही तालुक्यात अनेक विभागांची माहितीच दिली नसल्याचे उघड झाले आहे. तर काही ठिकाणी परिपूर्ण माहिती न दिल्याने शिक्षकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत अनेक शिक्षकांनी आक्षेप दाखल केले आहेत.
392 हरकती दाखल…
यापूर्वी सात निकषांपैकी तीन निकषांची पूर्तता करणाऱ्या शाळा अवघड क्षेत्रात येत होत्या. यावर्षी चार निकष पूर्ण करणाऱ्या शाळा अवघड क्षेत्रात आल्याने अनेक दुर्गम शाळा आता सुगम झाल्या आहेत. याबाबत 392 हरकती दाखल झाल्या असून जिल्हास्तरीय समितीसमोर या आक्षेपांवर चर्चा होणार आहे. चार निकषांच्या निर्णयावर शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली असून अन्य जिल्ह्याप्रमाणे तीन निकषांचा फार्म्युला अंमलात आणावा, अशी मागणी होत आहे. शिक्षकांच्या बदली निकषांबाबत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नुकतीच विनय गौडा यांची भेट घेऊन तीन निकषांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली होती. याबाबत आलेले आक्षेप व तीन की चार निकष याबाबत विनय गौडा काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.