जिल्हा कृषी अधीक्षक काचोळे : किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत बैठक
मंचर – हिरड्याची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना देण्यासाठी राज्यशासनाला हिरडा नुकसानभरपाई विषयक सुधारित प्रस्ताव तात्काळ पाठवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे योग्य त्या माहितीसह अहवाल सादर केला जाईल, असे जिल्हा कृषी अधीक्षक संजय काचोळे यांनी सांगितले.
पुणे येथे किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ. अजित अभ्यंकर, किसान सभेचे उपाध्यक्ष ऍड. नाथा शिंगाडे, जिल्हा अध्यक्ष डॉ. अमोल वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, जून 2020 मध्ये निसर्ग चक्रीवादळात हिरड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे झाले होते; परंतु याबाबत नुकसानभरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही.
हिरडा नुकसानभरपाई मिळावी यासाठी किसान सभेच्या वतीने जून 2020 पासून आजतागायत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. हिरड्याची नुकसानभरपाई मिळावी यासाठी हजारो शेतकऱ्यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केलेले आहेत. राज्य शासनाने दिलेले लेखी आश्वासन पाळावे यासाठी किसान सभेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
यासर्व पार्श्वभूमीवर राज्यशासनाला पुन्हा एकदा, सुधारित हिरडा नुकसानभरपाई विषयी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या अहवालावरून जिल्हाधिकारी कार्यालय, राज्य शासनास सादर करणार आहे. जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या समवेत झालेल्या चर्चेत हिरडा नुकानभरपाई विषयक सादर करण्यात येणाऱ्या अहवालात कोणकोणते मुद्दे असावे. याविषयी किसान सभेच्या वतीने सविस्तर मुद्दे मांडून निवेदन देण्यात आले.
मंत्र्यांना आश्वासनाचा विसर
हिरड्याची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना देण्यासाठी किसान सभेच्या वतीने साधारण एक वर्षापूर्वी नाशिक ते मुंबई व अकोले ते संगमनेर असे दोन लॉंग मार्च या वर्षांमध्ये निघाले होते. या दोन्ही लॉंग मार्चमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी हिरड्याची नुकसानभरपाई दिली जाईल, असे आश्वासन दिले होते; परंतु अद्याप हिरड्याची नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यामुळे भविष्यात पुन्हा मोठे आंदोलन केले जाईल, अशी माहिती किसान सभेचे जिल्हाध्यक्ष डॉ. अमोल वाघमारे यांनी सांगितले.