मुंबई – “गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळवला. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे ते शक्य झाले. गुजरात जिंकले. ते जिंकणारच होते. पण भाजपाने हिमाचल प्रदेश गमावले व दिल्लीची महानगरपालिकादेखील गमावली. हिमाचलमध्ये कॉंग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले. या दोन राज्यांत मोदी मंत्र का चालला नाही?” असा जळजळीत सवाल सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.
राजकारण एक खेळ आहे. चलाख लोक हा खेळ खेळतात. मूर्ख लोक त्यावर दिवसभर चर्चा करतात. सध्या आपल्या देशात यापेक्षा वेगळे काय सुरू आहे? मोदींनी गुजरात जिंकले. या विजयावरच आता चर्चा सुरू आहे. भारतवर्ष एकत्र राहावे म्हणून ‘भारत जोडो’ यात्रेवर राहुल गांधी आहेत. त्याच वेळी देशातील दोन राज्यांच्या विधानसभा व दिल्ली महानगरपालिकेचे निकाल लागले.
“भाजपने राजधानी दिल्लीतील 15 वर्षांची सत्ता गमावली. दिल्ली महानगरपालिकेत भाजप पराभूत झाली. देशाच्या राजधानीतला हा पराभव. त्याच वेळी भाजपची सत्ता असलेले हिमाचल प्रदेश गमावले. काँग्रेसने येथे पूर्ण बहुमत मिळवून भाजपची सत्ता खेचून घेतली. म्हणजे तीन सामन्यांत भाजप फक्त एके ठिकाणी, गुजरातमध्येच जिंकला. अन्य दोन ठिकाणी ते पराभूत झाले. मोदी-शहांची जादू आपल्या गृहराज्यात चालली, पण प्रत्यक्ष दिल्लीत व हिमाचल प्रदेशात चालली नाही. याआधी ती पंजाबमध्येही अजिबात चालली नाही, पण भाजप फक्त विजयाचा उत्सव साजरा करतो. त्या उत्सवात पराभवाची चर्चा करणे लोक विसरतात. हा मूर्खपणाच आहे” असं रोखठोक मत सामनातून खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.
“मोदींच्या नेतृत्वाखाली गुजरातेत भाजपास घवघवीत यश मिळाले. मोदी हे मोठे नेते आहेत व आता ते जागतिक ‘जी 20’ गटाचे अध्यक्ष झाल्याचा प्रचार गुजरात निवडणुकीत झाला. पण हे घवघवीत यश हिमाचल व दिल्लीत का मिळाले नाही? याचा विचार विरोधकांनी एकत्र येऊन करायला हवा. उद्या निवडणुका झाल्या तर मध्यप्रदेश, कर्नाटक ही दोन्ही राज्ये काँग्रेस सहज जिंकेल. महाराष्ट्र तर भाजपने गमावला आहे. प. बंगाल, पंजाबात मोदी नाहीत. बिहारचे चित्र वेगळे दिसेल. लालू यादव हे किडनी बदलानंतर बरे होऊन सक्रिय होतील. फक्त उत्तर प्रदेश व गुजरात या दोन राज्यांवर भाजप भरवसा ठेवू शकेल. पण विरोधक एकत्र झाले तर या दोन राज्यांचाही फार प्रकाश पडणार नाही” अशी टोलेबाजी रोखठोकमधून करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशसह इतर राज्यांतील पोटनिवडणुकांतही विरोधकांना चांगले यश मिळाले. पण तरीही चर्चा फक्त गुजरातचीच.गुजरात जिंकणारच होते. हिमाचल, दिल्लीत लोकांनी का नाकारले, यावरही चर्चा होऊ द्या असं स्पष्ट मत रोखठोकमधून व्यक्त करण्यात आले आहे.