पुणे -राज्यात सुमारे तीन हजार शिक्षणसेवकांची पदे भरण्यास सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिली आहे. पात्र, उमेदवारांसाठी “पवित्र’ पोर्टलच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली.
राज्यात शिक्षणसेवकांची एकूण 9 हजार 80 पदे रिक्त आहेत. त्यातील 5 हजार 970 पदे भरण्याची प्रक्रिया फेब्रुवारीमध्येच पूर्ण करण्यात आली आहे, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. करोनामुळे काहीकाळ भरतीप्रक्रिया थांबवली होती.
मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षणसेवकांची पदे भरण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी.
तसेच शिक्षणसेवक पदासाठी गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने “अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड केले जाणार आहे. तसेच खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये या चाचणी परीक्षेत उच्चतम गुण मिळवणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेऊन त्या आधारे अंतिम निवड होणार आहे.
दरम्यान, वित्त विभागाने शिक्षण सेवक पदाच्या प्रलंबित भरतीसाठी मान्यता दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने शासकीय नोकऱ्यांमधील नियुक्त्या देताना “एसईबीसी’ आरक्षण रद्द ठरवले आहे. त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करून सुमारे तीन हजार शिक्षण सेवक पदांसाठीची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यास सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिली आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत याबाबतची कार्यवाही लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.