रांजणगाव गणपती -आपत्कालीन परिस्थितीत सर्वांनी समन्वय ठेवून काम करणे गरजेचे आहे. राज्य सरकार करोना काळात उत्तम काम करत आहे, असे मत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले. रांजणगाव एमआयडीसी (ता. शिरुर) येथे करोना आढावा बैठकीत गृहमंत्री वळसे पाटील बोलत होते. करोना चाचण्या, लसीकरण, तालुक्यातील बेड, ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनची उपलब्धता, आणि करोनाची साखळी तोडण्याबाबत करावयाच्या उपाययोजनांचा आढावा पाटील यांनी घेतला.
यावेळी आमदार ऍड अशोक पवार, माजी आमदार पोपटराव गावडे, आंबेगाव शिरुर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील,माजी सभापती विश्वास कोहकडे, राजेंद्र गावडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसीलदार लैला शेख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दामोदर मोरे, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, दत्तात्रय पाचुंदकर उपस्थित होते.
करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकारच्या वतीने लॉकडाऊन करण्यात आला आहे. परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे, या पार्श्वभूमीवर वळसे पाटील यांनी आढावा घेऊन आरोग्य विभागासह महसूल व पोलीस प्रशासनाला सूचना दिल्या. बाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी सरकारने लागू केलेल्या निर्बंधामुळे नागरिक व व्यावसायिकानी शिस्त पाळावी, स्थलांतरीत व्यक्तीमुळे संसर्ग वाढतो, नागरिकांनी घाबरून न जाता लसीकरण करावे, योग्य उपचार, शारीरिक व मानसिक सुदृढता यामुळे करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त आहे.