अनिल शिंदेंकडून राजीव गांधी अपघात सानुग्रह योजनेचा पाठपुरावा
शिक्रापूर, {शेरखान शेख}- शिरुर तालुक्यातील काही युवक गतवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी देवदर्शनासाठी जाताना आमदाबादच्या सहाजणांवर काळाने झडप घातली. या घटनने शिरूर तालुका सुन्न झाला. कुटुंबातील हिरावलेल्या तरुणांच्या आठवणी आजही कायम आहे. माजी प्राचार्य अनिल शिंदे यांनी यातील तीन विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना राजीव गांधी अपघात सानुग्रह योजनेचे लाखोंचे अनुदान मिळवून दिले. अनुदानाची रक्कम खात्यावर जमा होताच त्यांना अश्रू आवरता आले नाही.
मागील वर्षी अपघातात ओंकार जालिंदर गोरखे, समाधान श्रावण साळवे व धीरज अजय मोहिते या तिघांचा मृत्यू झाला होता. दशक्रिया विधीदरम्यान शिंदे यांनी श्रद्धांजली सभेत राज्य सरकारच्या राजीव गांधी सानुग्रह अपघात विमा योजनेची माहिती दिली. विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास एक लाख पन्नास हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जात असून शासनाकडून पहिली ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना असल्याचे सांगितले होते.
शिंदे यांनी उपसरपंच प्रदीप साळवे यांच्या मदतीने योजनेचा लाभ विद्यार्थ्यांच्या पालकांना मिळवून देण्यासाठी स्वतः लक्ष घालत प्राचार्य, मुख्याध्यापक, गटविकास अधिकारी, तहसीलदार, पोलीस यांच्याकडून कागदपत्रे घेत प्रस्ताव तयार करुन जिल्हा परिषदेत सादर केला. त्रुटीसंदर्भात पाठपुरावा केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाशी मंत्रालयात पाठपुरावा केला. अखेर एक वर्षानंतर सर्व प्रकरणे मंजूर झाली.
ओंकार गोरखे, समाधान साळवे व धीरज मोहिते या प्रत्येक मुलाच्या पालकांच्या खात्यावर प्रत्येकी एक लाख पन्नास हजार रुपये जमा झाले. सेवानिवृत्त प्राचार्य शिंदे यांच्या प्रयत्नाने या कुटुंबीयांना आधार मिळाला आहे.
अनेक शाळा अनभिज्ञ- शिंदे
प्रत्येक शाळकरी विद्यार्थ्यासाठी योजना असून अपघात, मृत्यू, अवयव निकामी, शस्त्रक्रिया यासाठी अनुदान मिळते. मात्र, काही शाळांचे प्रमुख शाळेत अशी घटना घडूनही प्रस्ताव तयार करीत नाही, हे दुर्दैवी आहे. मात्र विद्यार्थी हिताची ही योजना सर्व शाळांनी माहीत करून घ्यावी. त्याचा लाभ गोरगरीब कुटुंबांना देण्यासाठी प्रयत्नशील रहावे, अशी अपेक्षा असल्याचे सेवानिवृत्त प्राचार्य शिंदे यांनी सांगितले.
तिघांची परिस्थिती बेताची
ओंकार गोरखे मामाकडे शिक्षणासाठी आलेला त्याचे आईवडील मोलमजुरी करतात. समाधान साळवेला वडील नसून आई मोलमजुरी करते. त्याला पाच बहिणी त्यांच्या पाठीवर समाधानचा जन्म झालेला. पण अपघातात एकुलता समाधान गेला.
समाधानचा भाचा धीरज चिंचोली मोराची येथील रहिवासी आहे. मात्र, शिक्षणासाठी मामाकडे आला होता. परंतु मामा- भाचे दोघांनाही प्राणास मुकावे लागले. पालकांच्या खात्यावर रक्कम जमा झाल्याने त्या तिघांच्या आईच्या डोळ्यांत पाणी तरळले. हुंदका त्या दाबू शकल्या नाहीत.