पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मनमोहक नृत्य, सुमधुर गायन यांसह विविध कलागुणांचे सादरीकरण आणि इनोव्हेशन, तंत्रज्ञानाच्या अविष्कारातून विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिभेचे, उत्साहाचे दर्शन घडवले.
आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे (एआयटी) ‘अल्केमी २०२४’ आंतरमहाविद्यालयीन क्रीडा-सांस्कृतिक व तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ‘अल्केमी-२०२४’ महोत्सव, ‘पेस’ (क्रीडा), ‘अमेथिस्ट’ (सांस्कृतिक) आणि ‘सोल्यूशन्स’ (तंत्रज्ञान) यांचा त्रिवेणी संगम होता. ४० पेक्षा अधिक महाविद्यालयांतून जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांनी या महोत्सवात सहभाग घेतला.
अमेरिका, इंग्लंड यांसह भारतातील सात आयआयटी, पाच आयआयआयटीमधून विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी आपले तांत्रिक कौशल्य लावत तंत्रज्ञानाचे अद्भुत आविष्कार दाखवले. ‘अमेथिस्ट’मध्ये पथनाट्य, प्रश्नमंजूषा, नाट्य, नृत्य, गायन व अन्य १३ प्रकारच्या स्पर्धा होत्या.
कांस्यपदक विजेता भारतीय तिरंदाज अतुल वर्मा यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. प्रसंगी ‘एआयटी’चे संचालक ब्रिगेडीयर (नि.) अभय भट यांच्यासह शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. खेळ आपल्याला सतत पुढे जाण्याची प्रेरणा देतात. आपल्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी खेळ उपयुक्त असल्याचे वर्मा म्हणाले. स्पर्धेचे बक्षीस वितरण भारतीय ॲथलिट सुमी कलीवरण यांच्या हस्ते झाले.