सातारा -शासन निर्णयानुसार प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अंत्योदय योजनेत सहभागी नसणाऱ्या उर्वरित सर्व केशरी रेशन कार्डधारकांना मे व जून महिन्यांकरता गहू व तांदूळ याचे वाटप सर्व रेशन दुकानांमधून करण्यात येणार आहे. त्यानुसार 1 ते 10 तारखांदरम्यान सर्व रेशन दुकानांमधून गहू व तांदूळ याचे वाटप करण्यात येणार आहे.
मे महिन्याचे वाटप मेमध्ये व जून महिन्याचे वाटप जूनमध्ये होणार आहे. यामध्ये प्रति व्यक्ती 8 रुपये किलोप्रमाणे तीन किलो गहू व 12 रुपये किलोप्रमाणे 2 किलो तांदूळ वितरित केला जाणार आहे. ज्या रेशन दुकानात रेशन कार्डची नोंद असेल त्याच दुकानात हे धान्य मिळणार आहे. हा कोटा मे व जून महिन्याचा असून तो त्याच महिन्यात वितरित केला जाणार असल्याची माहिती साताऱ्याच्या तहसीलदार आशा होळकर यांनी दिली. धान्य वितरणामध्ये संबधित क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. शक्यतो शहर क्षेत्रात शासकीय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आणि ग्रामीण भागात ग्रामसेवकांच्या उपस्थितीत धान्य वितरण होईल याची दक्षता घेतली जाणार आहे, असे होळकर यांनी सांगितले.
या कार्डधारकाने किंवा त्या कुटुंबातील व्यक्तीने मूळ शिधापत्रिका घेऊन त्या दुकानात जाणे आवश्यक आहे. कार्डामध्ये नाव नसणाऱ्या व्यक्तीस धान्य मिळणार नाही. मूळ शिधापत्रिका नसल्यास त्या व्यक्तीस धान्य देता येणार नाही, असे रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी सांगितले. “ज्यांचे नाव रेशनिंग कार्डावर नाही, त्यांना अजिबात धान्य दिले जाणार नाही. खातेदारांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून व तोंडाला मास्क लावून धान्य ताब्यात घ्यायचे आहे. दुकानात गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावयाची आहे. दि. 11 ते 18 या दरम्यान केशरी रेशन कार्डधारकांना धान्य वितरण होईल.
धान्याचे वितरण अथवा धान्यांच्या वितरणाबाबत ज्यांना शंका असेल त्यांनी टोल फ्री क्रमांक 1077 व ग्रामीण भागात ग्रामसुरक्षा समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन शेटे यांनी केले. सर्वरेशन दुकानदार ग्राहकांच्या सेवेसाठी जीव धोक्यात घालून धान्य वाटप करीत आहेत, त्यामुळे शासनाच्या आदेशांचे पालन करून दुकानदारांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.