कोलकता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केल्यावरून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे कोश्यारी यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत.
ममतांनी गुरूवारी येथे पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्रातील घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. घटनात्मक पदांवर असणाऱ्यांविषयी मी साधारणपणे बोलत नाही. मात्र, काही लोक (राज्यपाल) भाजपचे मुखपत्र असल्यासारखे वागत आहेत. त्या लोकांना काही राज्यांमध्ये समांतर प्रशासन चालवायचे आहे. माझ्या राज्यातही काय चालले आहे ते तुम्ही पाहतच आहात, असे त्या म्हणाल्या. काही महिन्यांपूर्वीच पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी जगदीप धनखड यांची नियुक्ती झाली. मात्र, राज्यपाल आणि ममता सरकारमध्ये अनेकदा संघर्षाची स्थिती पाहावयास मिळत आहे.