नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केंद्र सरकारच्या पॅकेजचे सादरीकरण संपवले. त्यात त्यांनी जो खर्चाचा सारा तपशील दिला आहे त्याला कॉंग्रेसने जोरदार आक्षेप घेतला असून त्यांनी म्हटले आहे की या 20 लाख कोटी रूपयांच्या पॅकेज मध्ये सरकारचा खर्च जीडीपीच्या केवळ 1.6 टक्के इतकाच आहे. हा खर्च किमान दहा टक्के इतका असेल असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात केला होता.
या संबंधात आज पत्रकार परिषदेत बोलताना कॉंग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा म्हणाले की, सरकारने जो 20 लाख कोटी रूपयांचा खर्च जाहीर केला आहे त्यात प्रत्यक्ष सरकारचे केवळ 3 लाख 22 हजार कोटी रूपयेच खर्च होणार आहेत. आमचा हा दावा खोटा ठरवून दाखवा त्यावर आमच्याशी जाहींर प्रतिवाद करून दाखवा असे आव्हानही त्यांनी निर्मला सीतारामन यांना दिले. पंतप्रधानांनीही यावर आता भाष्य करावे असे आव्हान त्यांनी दिले.
दरम्यान आता सरकरच्या या पॅकेजवर उद्योग व अन्य क्षेत्रातूनही प्रतिक्रीया यायला लागल्या असून किरण मुजुमदार शॉ यांनी म्हटले आहे की या पॅकेज मध्ये कोणतेही ठोस निर्णय नाहींत. 20 लाख कोटी ही प्रचंड मोठी रक्कम आहे. ती खरेच सत्कारणी लागली असती तर अर्थचक्र वेगाने फिरले असते. पण या पॅकेज मध्ये पुर्ण निराशा करण्यात आली असून बाजारातील डिमांड वाढवण्यास हे पॅकेज असमर्थ ठरणार आहे अशी प्रतिक्रीयाही त्यांनी दिली आहे