नवी दिल्ली – दिल्ली दंगलीच्या संबंधात संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा होणे आवश्यक आहे पण अशी चर्चाच घडू न देण्याची जी हट्टी भूमिका सरकारने घेतली आहे ती आपल्या सारख्या जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाला शोभेशी नाही. त्यामुळे सरकारने ही हट्टी भूमिका सोडली पाहिजे अशी मागणी कॉंग्रेस पक्षाने केली आहे.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की हा केवळ संसदेत चर्चा करण्याचाच प्रश्न नसून या दंगलींची जबाबदारी निश्चीत करण्याचाही विषय आहे. अशा पद्धतीलाच संसदीय लोकशाही म्हणतात असा टोमणाहीं त्यांनी मारला.
राजधानी दिल्लीत जे काही झाले त्याचा सर्वांनीच एकत्र येऊन निषेध केला पाहिजे आणि अशा प्रकारच्या हिंसाचाराच्या विरोधात सारा देश एकत्रितपणे त्याचा धिक्कार करतो हा संदेश संसदेतून सर्व देशवासियांसाठी आणि दिल्लीकरांसाठी दिला गेला पाहिजे असे ते म्हणाले. अशा स्वरूपाच्या भीषण दंगलीच्या पार्श्वभूमीवर संसदेने मौन बाळगणे हेही आपल्याला शोभादायी नाही असे त्यांनी म्हटले आहे.
दिल्ली दंगलींचे जगभरात पडसाद उमटत असून आपल्या काही मित्र देशांनीही या प्रकाराविषयी चिंता व्यक्त केली आहे असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले. या पार्श्वभूमीवर सरकारने संसदेत तातडीने या विषयी चर्चा उपस्थित करून दिल्ली दंगलीबाबत सरकार आणि संसदही तितकीच संवेदनशील आहे असा संदेश सरकारने देण्याची गरज आहे असेही शर्मा यांनी नमूद केले.