नवी दिल्ली: २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यासाठी गुगल मॅप्स आणि इमेजेसचा वापर करण्यात आला, अशी याचीका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. किसालया शुक्ला या वकिलाने ही याचिका दाखल केली आहे.
गुगल मॅप्ससंदर्भात दाखल केलेल्या याचिकेत शुक्ला म्हणाले, इंटरनेटवरून नकाशे आणि गुगल अर्थवरील सॅटेलाइट इमेजेव्दारे देशातील प्रत्येक भागाची माहिती मिळवता येते. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी सुद्धा गुगल इमेजेसच्या साहाय्याने माहिती मिळवली असल्याचा दावा शुक्ला यांनी केला आहे.
गुगल मॅप्समुळे भारताची एकात्मता धोक्यात आली. तसेच भारतातील अतीसंवेदनशील परिसराची माहिती इंटरनेटवर उपलब्ध असल्याचे शुक्ला म्हणाले. मुंबईत हल्यात जिवंत पकडलेल्या दहशतवाद्याने देखील अशी कबुली दिली असल्याचा संदर्भ शुक्ला यांनी याचिकेत दिला आहे.