नवी दिल्ली – जगभरात इंटरनेट वापरणाऱ्या नागरिकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या गुगलने आपला 23वा वाढदिवस थाटात साजरा केला. एवढ्या कमी कालावधीत लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेल्या गुगलबाबत अनेक मनोरंजक कथा बाहेर येऊ लागल्या आहेत.
गुगल एक संवेदनशील आधुनिक कंपनी आहे. यासाठी गूगल आपल्या कार्यालयात वेगळेच वातावरण निर्माण करते. कर्मचाऱ्यांना भरपूर सोयी सुविधा आणि आराम उपलब्ध करण्यात येतो. त्यामुळे गुगलला जॉईन झालेली व्यक्ती शक्यतो गुगल कंपनी सोडत नाही.
गुगलच्या मुख्यालयात फक्त इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केला जातो. त्यामुळे आवाज होत नाही आणि प्रदूषणाची हानी होत नाही. त्याचबरोबर गुगलच्या मुख्यालयाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मोकळी जागा आहे. त्या ठिकाणी गवत येते. हे गवत यंत्राने कापण्याऐवजी गुगल यासाठी 200 शेळ्या भाड्याने घेते.
या शेळ्या गुगलच्या मुख्यालयाच्या परिसरात सोडल्या जातात. त्या हे गवत फस्त करतात. या प्रयोगाबद्दल गुगलचे अधिकारी सांगतात की, एक तर ह्या शेळ्या गवत खाताना सुंदर दिसतात. त्याचबरोबर या शेळ्या त्या परिसरात आवश्यक ते खत निर्माण करतात. यंत्राने जो आवाज होतो त्यामुळे परिसरातील कर्मचाऱ्यांना त्रास होतो. त्याऐवजी शेळ्याच्या माध्यमातून गावात कमी करण्याचा प्रयोग गुगल करीत आहे.
अतिशय खडतर परिस्थितीमध्ये ही नवी कल्पना रुजविण्यासाठी गुगलचे कामकाज 27 सप्टेंबर 1998 रोजी सुरू झाले. या कंपनीचे संस्थापक सर्जेयी ब्रायन आणि लॅरी पेज 1995 मध्ये विद्यार्थी म्हणून स्टॅनफोर्ड विद्यापीठात भेटले. त्यांनी 1996 मध्ये याच विद्यापीठांमध्ये सर्च इंजिन प्रायोगिक पातळीवर सुरू केले. नंतर इतिहास घडला. आता रोज अब्जावधी विविध चौकश्या 150 भाषांच्या माध्यमातून करातात. सुरुवातीला एका छोट्या सर्व्हरवर काम चालू होते. आता जागतिक पातळीवर गुगलची 20 डेटा सेंटर आहेत. प्रत्येकाला आवश्यक ती माहिती मिळाली पाहिजे हे गुगलचे ब्रीद वाक्य अजूनही कायम आहे.
प्राथमिक अवस्थेत असताना या कंपनीचे नाव बॅकरब असे असल्याचे बोलले जाते. कालांतराने त्यामध्ये नामांतर करण्यात आले. सुरुवातीच्या काळामध्ये गुगल चालू असताना काही कर्मचाऱ्यांनी चुकीने त्यांचा फोन नंबर वेबसाईटवर प्रसिद्ध केला. त्यानंतर बरेच फोन येत असल्यामुळे त्यांना आपला नंबर बदलावा लागला होता.
1996 मध्ये या कंपनीच्या संस्थापकांनी आपला सर्व्हर ठेवण्यासाठी साध्या विटाची एक खोली तयार केली होती. त्यामध्ये दहा डिस्क होत्या. सुरुवातीला कंपनीचे कार्यालय कॅलिफोर्नियातील मेनलो पार्क येथील एका मित्राच्या गॅरेजमध्ये थाटण्यात आले होते. त्यानंतर सूसान मोसिकी यांच्याकडून एक जागा भाड्याने घेऊन त्यामध्ये कार्यालय उभारण्यात आले. आता सुसान यूट्यूबच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
सुरुवातीपासून गुगलचे ब्रीदवाक्य अनौपचारिक पातळीवर वाईट काही करू नका असे आहे. आता त्यामध्ये वाईट काही करू नका आणि काही वाईट असेल तर स्पष्ट बोला अशी भर टाकण्यात आली आहे.
काही काळानंतर गुगलच्या संस्थापकांना गूगल जागतिक पातळीवर प्रचंड लोकप्रिय होणार असल्याचा अंदाज आला होता. त्यामुळे गुगलशी साधर्म्य असलेली बरीच नावे गुगल कंपनीने विकत घेतली होती. आता साधर्म्य असलेल्या नावावर टाईप केले तरी हा शोध गुगल डॉट कॉमपर्यंत जातो.
सुंदर पिचाई यांची मुलाखत एप्रिलफुलच्या दिवशी
सध्या भारतीय वंशाचे सुंदर पीचाई गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांची पहिली मुलाखत एप्रिल फूलच्या दिवशी म्हणजे 1 एप्रिल 2004 रोजी झाली होती. त्याच दिवशी गुगल कंपनीने जीमेलची घोषणा केली होती. यासंदर्भात पिचाई यांना विचारण्यात आले मात्र त्यांना याबाबत माहीती नव्हती. कदाचित हा एप्रिलफूलचा जोक असावा असे पिचाई यांना वाटले होते.