राजगुरूनगर (रामचंद्र सोनवणे ) : खेड तालुक्यातील चासकमान धरण ९७.३२ टक्के भरले आहे. भीमाशंकर भोरगिरी परिसरात मोठा पाऊस पडत असल्याने पाणी सोडण्याची वरिष्ठांची परवानगी मिळताच कोणत्याही क्षणी धरणातून भीमानदीत विसर्ग सोडला जाणार आहे. भीमानदी कडेला राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन सहाय्यक अभियंता प्रेमनाथ शिंदे यांनी केले आहे.
खेड तालुक्यातील कळमोडी, चासकमान, भामा आसखेड या तीन धारणांपैकी कळमोडी १०० टक्के भरले आहे तर चास कमान धरण, आणि भामा आसखेड धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या उंबरठ्यावर आहेत. चास कमान धरण मागील वर्षी ३० ऑगस्टला भरले होते यावर्षी मात्र जवळपास महिनाभर अगोदर भरले आहे. सध्या चासकमान धरण डाव्या कालव्यातून ५५० क्यूसेस वेगाने तर वीज प्रकल्पासाठी २०० क्यूसेस वेगाने पाणी सुरु आहे.
चासकमान धरण ९७.३२ टक्के भरल्याने स्थानिक धरण प्रशासनाने पुणे येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धरणातून पाणी सोडण्याची परवानगी मागितली आहे. परवानगी मिळतात धरणाखालील नागरिकांना सतर्क करून धरणाचे दरवाजे उघडून भीमा नदीत विसर्ग सुरु केला जाणार आहे.
धरणाखाली भीमा नदी कडेला राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. तर नदीमध्ये नदीकडेला असलेले शेतकऱ्यांचे मोटारी इंजिन व शेतीपूरक साहित्य सुरक्षित स्थळी हलविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भीमाशंकर परिसरात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण मोठे असल्याने धरणातून मोठा विसर्ग सोडण्याची शक्यता अधिकाऱयांनी व्यक्त केली आहे.
* खेड तालुक्यातील तीन धरणाची पाणी पातळी, पर्जन्यमान पुढीलप्रमाणे
कळमोडी धरण:
* एकूण पाणी पातळी ६८७.००दशलक्ष घनमीटर
* एकूण साठा ४२.८७ दशलक्ष घनमीटर (१.५१ टीएमसी)
* उपयुक्त पाणीसाठा ४२.६७ दशलक्ष घनमीटर (१.५०टीएमसी)
* टक्केवारी १०० %
* आज पर्यंत धरण क्षेत्रात झालेला पाऊस ९१० मिलिमीटर.
चासकमान धरण:
* एकूण पाणी पातळी ६४९.२० दशलक्ष घनमीटर
* एकूण साठा २३५. ९६ दशलक्ष घनमीटर (८.२०टीएमसी)
* उपयुक्त पाणीसाठा २०८. ७७ दशलक्ष घनमीटर (७.२४ टीएमसी)
* टक्केवारी ९७. ३२ %
* आज पर्यंत धरण क्षेत्रात झालेला पाऊस- ४३९ मिलिमीटर.
भामा आसखेड धरण:
* एकूण पाणी पातळी ६६९.१० दशलक्ष घनमीटर
* एकूण साठा १९५. २९ दशलक्ष घनमीटर (६.९०टीएमसी)
* उपयुक्त पाणीसाठा १८१.७७ दशलक्ष घनमीटर (६.४२ टीएमसी)
* टक्केवारी ८३. ७२%
* आज पर्यंत धरण क्षेत्रात झालेला पाऊस- ६९९मिलिमीटर.