नवी दिल्ली – उत्तराखंड येथील प्रसिद्ध केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहात लावण्यात आलेल्या सोन्याच्या पत्र्याच्या जागी पितळी पत्रा लावण्यात आला असून तेथील तब्बल 1.25 अब्ज रूपयांचे सोने गायब झाले आहे. हे प्रकरण गेले अनेक दिवस सोशल मिडीयात गाजते आहे. आता या प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा उत्तराखंड सरकारने केली आहे.
केदारनाथ मंदिराचे तीर्थ पुरोहित आणि चारधाम महापंचायतीचे उपाध्यक्ष संतोष त्रिवेदी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसिद्ध करून गर्भगृहाच्या भिंतींवर सोन्याचा मुलामा असलेले पत्रे काढून तिथे पितळी पत्रे बसवण्यात आल्याची माहिती दिली आहे. या मंदिरातील तब्बल 1.25 अब्ज रूपये किंमतीचे सोने अचानकच गायब झाल्याचा दावा त्यांनी या व्हिडीओत केला होता. त्यावर विरोधी पक्षांकडूनही वारंवार आक्षेप नोंदवण्यात आल्यानंतर आता उत्तराखंड सरकार या प्रकरणाच्या चौकशीसाठी राजी झाले आहे.
राज्याचे पर्यटन, धर्म आणि सांस्कृतिक मंत्री सतपाल महाराज यांनी शुक्रवारी सांगितले की त्यांनी आपल्या विभागाचे सचिव हरिचंद्र सेमवाल यांना या प्रकरणाच्या चौकशीसाठी गढवाल आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी सेमवाल यांना चौकशी समितीमध्ये तांत्रिक तज्ज्ञ तसेच सोनारांचा समावेश करण्यास सांगितले आहे. ते म्हणाले की, राज्य सरकार या प्रकरणाबाबत अत्यंत संवेदनशील आहे. जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल.
मंदिराच्या गर्भगृहात सोन्याचे पत्रे लावण्यासाठी श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समिती कायद्यामधील तरतुदींनुसार देणगी स्वीकारण्यात आली होती आणि त्यासाठी राज्य सरकारकडूनही परवानगी घेण्यात आली होती, असे त्यांनी स्पष्ट केले. गर्भगृहाला सोन्याचा मुलामा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करण्यात आला होता, असेही त्यांनी सांगितले.
एका देणगीदाराने सोने विकत घेतले आणि गर्भगृहाच्या भिंतींवर ते घातले त्यात मंदिर समितीची थेट भूमिका नाही असा दावाही त्यांनी केला. काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे बिल व इतर कागदपत्रे देणगीदाराने मंदिर समितीकडे जमा केल्याचे महाराज म्हणाले. विरोधी पक्षांनी या प्रकरणाला “अनावश्यक” महत्त्व देऊन चारधाम यात्रेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला.
यापूर्वी, बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने एका निवेदनात म्हटले होते की मंदिराच्या गर्भगृहात 23,777.800 ग्रॅम सोन्याचा वापर करण्यात आला होता. त्याची सध्याची किंमत सुमारे 14.38 कोटी रुपये होती, तर सोनेरी कामासाठी वापरल्या जाणाऱ्या तांब्याच्या प्लेट्सचे एकूण वजन 1,001.300 किलो होते आणि त्याची किंमत 29 लाख रुपये इतकी होती. पण मंदिराच्या मुख्य पुरोहिताने मात्र हे 1.25 अब्ज रूपयांचे सोने होते असे म्हटले आहे.